शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By Admin | Updated: July 4, 2015 02:07 IST2015-07-04T02:07:56+5:302015-07-04T02:07:56+5:30

यंदा सालेकसा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी चिखलखारी टाकल्या असून अनेकांच्या शेतात पाण्याचा निचरा किंवा पाणी साठा..

Due to the sowing crisis of the farmers | शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

काहींचे साधले : काहींचे बिघडले, पाऊस बेपत्ता
सालेकसा : यंदा सालेकसा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी चिखलखारी टाकल्या असून अनेकांच्या शेतात पाण्याचा निचरा किंवा पाणी साठा प्रमाण कमी जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे बिघडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
काही शेतकऱ्यांचे पऱ्हे पावसापूर्वी टाकल्याने चांगल्या प्रकारे बीज अंकुरीत झाले व त्यांचे पऱ्हे घनदाट हिरवेगार उगवले आहेत. यंदा हवामान विभागाने पावसाबद्दल दिलेला अंदाज शेतकऱ्यांना खचित करणारा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात धान पेरणी केलीच नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे दुर्लक्ष करीत पावसापूर्वीच मृग नक्षत्रात पेरणी केली. मृग नक्षत्राच्या शेवटच्या दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली आणि अनेक शेतकरी हळबडून जागे झाले व पेरणीच्या कामाला लागले. परंतु पाऊस जास्त आल्याने सर्वत्र शेतात पाण्याचा साठा झाला आणि नाईलाजाने अनेक शेतकऱ्याने चिखल तयार करुन पऱ्हे टाकले. चिखलाचे पऱ्हे कमी जास्त होत मागे पुढे अंकुरीत होतात किंवा टेकरभागात बियाणे जसेच्या तसे राहतात. त्यांना पाण्याची गरज असते. काही बियाणे पाणी साचलेल्या ठिकाणी सडण्याच्या अवस्थेत येतात. त्यांना पूर्वीपासून कोरडे वातावरण हवे असते. अशा परिस्थितीत कुठे साधते तर कुठे बिघडते, अशी अवस्था असते. ही परिस्थिती यंदा जवळपास ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांच्या शेतात निर्माण झालेली आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे, असे चित्र सालेकसा तालुक्यात दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the sowing crisis of the farmers