कालव्याला पाणी नसल्याने अनेक गावात टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2015 01:22 IST2015-05-29T01:22:38+5:302015-05-29T01:22:38+5:30
ओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे.

कालव्याला पाणी नसल्याने अनेक गावात टंचाई
मागणीकडे दुर्लक्ष : ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचा प्रताप
आमगाव : ओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. कालव्याला पाणी सोडण्याची कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी देवरी यांच्यामार्फत १० डिसेंबर २०१४ ला देण्यात आले. ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
माजी पंचायत समिती सदस्य जियालाल पंधरे, किशोर रहांगडाले वळद व अनेक शेतकऱ्यांनी १० डिसेंबर २०१४ ला कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी लघु पाटबंधारे विभाग देवरी यांच्या मार्फत लेखी निवेदन देऊन कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली.
या कालव्याद्वारे वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा येथील शेतकऱ्यांना रबीसाठी पाण्याची मागणी करण्यात आली. मात्र धरणात साठा कमी असल्याच्या सबबीवर पाणी देण्यात आले नाही. उन्हाळ्यात कालव्याला आठ दिवसातून एकदा पाणी सोडले असते तर पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली नसती. उलट ओवारा प्रकल्पाचे पाणी तेलीटोला, कारुटोला, हेटी, कवडी, हरदोली, सातगाव या गावांना रबी करिता पाणी सोडण्यात आले, अशी अधिकारी भेदभावपूर्ण वागणूक करीत आहे. धरणात पाणी नाही म्हणून वेळकाढू धोरण अंगिकारुन कामचुकारपणा करीत आहेत. सध्या धरणात ३३५.४०० लेव्हल एवढा जलसाठा उपलब्ध आहे. कमीत कमी दीड मिटर पाणी काढला तरी धरणात पाणी राहू शकतो. ओवारा प्रकल्पाचे पाणी सोडले तर पाण्याची पातळी वर येईल व विहिर, बोअरवेलच्या माध्यमातून पाणी समस्या दूर होईल. तसेच कालव्याच्या पाण्यामुळे जी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती आहे ती थांबेल. सगळ्याच पक्षांचे आमदार या क्षेत्रातून निवडून गेले. मात्र पाणी समस्येवर कोणी ठोस तोडगा कोणी काढला नाही, अशी प्रतिक्रिया जियालाल पंधरे यांनी व्यक्त करुन कार्यकारी अभियंता गोंदिया, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता सूर्यवंशी, मध्यम प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. जर समस्या लक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर ओवारा धरणावर ठिय्या आंदोलनाचा इशारा जियालाल पंधरे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)