बोनसवर विसंबून राहू नका

By Admin | Updated: October 18, 2015 02:01 IST2015-10-18T02:01:56+5:302015-10-18T02:01:56+5:30

धान उत्पादकांना गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही बोनसरुपी मदत देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे, पण त्याच्या भरोशावर राहू नका.

Do not rely on bonuses | बोनसवर विसंबून राहू नका

बोनसवर विसंबून राहू नका

मुख्यमंत्र्यांनी टोलवले : उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा शेतकऱ्यांना दिला सल्ला
गोंदिया : धान उत्पादकांना गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही बोनसरुपी मदत देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे, पण त्याच्या भरोशावर राहू नका. उत्पादकता कशी वाढेल आणि त्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष द्या, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियात शेतकऱ्यांना उद्देशून दिला.
येथील सर्कस मैदानावर येथे शनिवारी (ता.१७) राईस मिलर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित राईस मिलिंग एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आ. गोपालदास अग्रवाल, आ.राजेंद्र जैन, आ.विजय रहांगडाले, आ.संजय पुराम, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, भाजपा प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, जिल्हा राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल आदी मंचावर उपस्थित होते.
राईस मिलर्सच्या वतीने आयोजित या एक्स्पोचे मुख्ममंत्र्यांनी कौतुक केले. उद्योगांना चालना देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी असे प्रदर्शन फायदेशिर ठरेल असे ते म्हणाले. वीजेचे दर कमी करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे. यासंदर्भात राज्यपालांची मंजुरी मिळताच विदर्भ व मराठवाड्यातील वीजेचे दर कमी करण्याचा निर्णय अंमलात आणला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. धानाची वाहतूक करण्यासाठी योग्य दर देण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. मात्र कोणताच उद्योग किंवा शेती व्यवसाय शासकीय सवलत आणि मदतीच्या भरोशावर टिकू शकत नाही. शेतीची उत्पादकता वाढवावी लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात उच्च दर्जाच्या उत्पादनाची मागणी आहे. तशा प्रकारचे उत्पादन आपल्याला तयार करावे लागेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण बाबींचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोदामाअभावी आतापर्यंत शासनाचा धान सडत होता. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी मेक्सिकन आणि युरोपीयन कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केलेली गोदामे राज्यात वापरण्याबाबत शासन विचार करीत आहे. त्याचप्रमाणे सोसायटीच्या माध्यमातूनही गोदामे उभी करता येतील का, यावर विचार होणे गरजेचे असल्याचे ना.फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, पूर्व विदर्भ हा तांदळाचे कोठार आहे. या शासनाने राईस मिलर्सना भरडाईचे दर प्रतिक्विंटल २० वरून ४० रुपये (दुप्पट) वाढवले. हा या शासनाचा मिलर्ससाठी दिलासादायक निर्णय आहे. मात्र ज्या जिल्ह्यात पावसाचे पाणी जास्त पडते त्या धान उत्पादक गोंदिया, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात पाण्याचा योग्य वापर होत नसल्याची खंत ना.बडोले यांनी व्यक्त केली.
धापेवाडा सिंचन प्रकल्प टप्पा दोनचे काम लवकर पूर्ण झाल्यास त्याचा फायदा भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जवळपास ९ तालुक्यांना होऊ शकतो. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खा.नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी आ.राजेंद्र जैन यांनी राईस मिल उद्योगाला केंद्र व राज्य सरकारच्या मदतीची गरज व्यक्त करतानाच शेतकऱ्यांना धानाला कमी भाव असल्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा जास्त बोनस द्यावा आणि लवकरात लवकर धान खरेदी केंद्रं सुरू करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. आ.गोपालदास अग्रवाल यांनीही राईल मिलर्सच्या समस्या मांडून कृषीमालावर आधारित उद्योगांना चालना देण्याची, प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी निधी देण्याची आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली. विनोद अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले. (जिल्हा प्रतिनिधी)
शेतकऱ्यांसाठी मेळावा घ्या
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांंना धानाची उत्पादकता वाढविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल व त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल यासाठी शेतकरी मेळावा व चर्चासत्र घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यात देशातील कृषितज्ज्ञ आणि कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना बोलवा, अशी सूचना त्यांनी पालकमंत्र्यांना केली.
मेडिकल कॉलेज पुढच्या वर्षी सुरू करा
गोंदियातील प्रस्तावित मेडिकल कॉलेजला यावर्षी हुलकावणी बसली, मात्र पूर्ण पाठपुरावा करून पुढच्या वर्षी हे मेडिकल कॉलेज सुरू होईलच, आणि ही जबाबदारी मी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे देतो असे मुख्यमंत्री म्हणाले. लंडनमधील बाबासाहेबांचे लिलाव होत असलेले घर ना.बडोले यांनी विकत घेऊन दाखविले तर मेडिकल कॉलेज काय आहे, अशी कोटी त्यांनी केली.
बिरसी विमानतळावर मुख्यमंत्र्याचे स्वागत
गोंदिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बिरसी विमानतळावर आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, आमदार विजय रहांगडाले, संजय पुराम, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनीही सुद्धा पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Do not rely on bonuses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.