सा.बां.विभागाच्या कारभाराने पंधरवाड्यात तीन अपघात
By Admin | Updated: October 16, 2014 23:27 IST2014-10-16T23:27:17+5:302014-10-16T23:27:17+5:30
सडक/अर्जुनी तालुक्यातील सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर असलेल्या केसलवाडा वळणावर बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराने या पंधरवाड्यात तीन मोठे अपघात घडले. या अपघातातील

सा.बां.विभागाच्या कारभाराने पंधरवाड्यात तीन अपघात
वामन लांजेवार - शेंडा कोयलारी
सडक/अर्जुनी तालुक्यातील सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर असलेल्या केसलवाडा वळणावर बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराने या पंधरवाड्यात तीन मोठे अपघात घडले. या अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तींना अपंगत्व वाट्याला आले असून वाटसरूंनी संताप व्यक्त केला आहे.
सडक/अर्जुनीवरून तीन किमी अंतरावर असलेल्या केसलवाडा (मुनिश्वर टोला) जवळ जीवघेणे वळण असून रस्त्यांच्या दोन्ही कडेला जंगल, झुडपे व उंच गवत वाढलेले आहे. त्यामुळे आमोरसमोरून येणारी वाहने एकमेकांना दिसत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आतापर्यंत नऊ तर एकाच पंधरवाड्यात तीन मोठे अपघात झाले. या अपघातातील जखमी अपंग झाले आहेत.
सुरक्षेच्या दृष्टिने रस्त्याची देखभाल किंवा किंवा डागडुजी करण्यात आली नाही. कडेला वाढलेली झुडपे, अपघातग्रस्त ठिकाणावर वाहने हळू चालवा तसेच धोक्याचे वळण लिहिलेले बोर्ड लावणे यासारख्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. परंतु याकडे सडक/अर्जुनीपासून शेंडा गावापर्यंत पूर्णत: दुर्लक्ष करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कर्तबगारीचा परिचय देवून उच्चांक गाठला आहे. मागील आठवड्यात सोमवारी दुपारी ३.३० वाजता सदर लोकमतचे वार्ताहर वामन लांजेवार हे सडक/अर्जुनी येथे येत असताना याच वळणावर समोरून येणाऱ्या आॅटोच्या जबर धक्क्याने पत्नीसह जखमी झाले. त्यांच्या उजव्या पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने ते अपंगच झाले आहेत. याला जबाबदार कोण?
त्याचप्रमाणे सडक/अर्जुनीच्या बाजार चौकात आॅटो चालक १५ ते २० प्रवासी भरूनच दिवसभर शेंडा ते सडक/अर्जुनी मार्गावर चालतात. कधीकधी चालकाला बसायला जागा राहत नाही व तो वाहनावर ताबा ठेवू शकत नाही, असे अनेकदा पहायला मिळते. बाजाराच्या दिवशी तर परिस्थिती बिकटच असते. हा सर्व प्रकार पोलीस वर्दीवर राहून उघड्या डोळ्याने ते खांबासारखे उभे राहून बघतात. परंतु हप्ता वसुलीसाठी कोणतीच कारवाई करीत नाही, असा आरोप नागरिकांचा आहे.
सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर अपघातांना आमंत्रण देणारी अनेक वळणे आहेत. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आतापर्यंत नऊ अपघात व सध्या एकाच पंधरवाड्यात तीन जबर अपघात घडूनही अधिकारी मुंग गिळून गप्प का? हा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. नुसत्या वेतनासाठीच ते उपस्थिती दाखवत असल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्वरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंची सफाई करण्यात यावी. जेणेकरून अपघात टाळता येतील. अन्यथा अपघातग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत व नुकसान भरपाई मिळेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठेवण्यात येईल, त्यांना इतरत्र हलविण्यात येणार नाही, असे वाहतूकदारांनी ठणकावून सांगितले आहे.