जिल्हावासीयांचा अपेक्षाभंग
By Admin | Updated: July 8, 2014 23:31 IST2014-07-08T23:31:36+5:302014-07-08T23:31:36+5:30
बुलेट ट्रेनची संकल्पना साकारून सादर करण्यात आलेला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा अर्थसंकल्प गोंदिया जिल्हावासीयांसाठी मात्र फुसका बार ठरला. बजेटमध्ये गोंदियाला कव्हर करणाऱ्या दोन रेल्वेगाड्या मिळाल्या

जिल्हावासीयांचा अपेक्षाभंग
दोन गाड्यांची उपलब्धी : मात्र मूळ मागण्या ‘जैसे थे’
गोंदिया : बुलेट ट्रेनची संकल्पना साकारून सादर करण्यात आलेला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा अर्थसंकल्प गोंदिया जिल्हावासीयांसाठी मात्र फुसका बार ठरला. बजेटमध्ये गोंदियाला कव्हर करणाऱ्या दोन रेल्वेगाड्या मिळाल्या ही थोडी समाधानाची बाब असली तरी रेल्वे प्रवाशांच्या मूळ मागण्यांना मात्र हातही घालण्यात आला नाही. यामुळे जिल्हावासीयांचा या अर्थसंकल्पाने अपेक्षांचाभंग झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
विशेष म्हणजे रेल्वेच्या बिलासपूर झोनमध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वेस्थानक म्हणून गोंदियाची नोंद आहे. महाराष्ट्रासह लगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील प्रवासीही या स्थानकावरून दूरच्या प्रवासासाठी गाड्या पकडतात. त्यामुळे प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता येथील प्रलंबित मागण्यांबाबत यावेळी तरी विचार होईल असे सर्वांना वाटत होते.
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये गोंदियाशी निगडीत मुख्य असे काहीच नाही. अर्थसंकल्पात नागपूर-बिलासपूर ही ‘हायस्पीड’ गाडी व हापा-बिलासपूर ही गाडी देण्यात आली. या गाड्या गोंदियामार्गे जाणार असल्यामुळे गोंदियावासीयांना त्या गाड्यांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय गोंदिया-मुजफ्फरपूर ही गतवर्षी प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात सुरू झालेली गाडी बरौनीपर्यंत वाढविण्यात आली. मात्र गोंदिया रेल्वेस्थानकाच्या विकासासह काही मार्गाच्या विकासाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याने अनेकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.
जबलपूर लाईन ब्रॉडगेज करण्याची मागणी, चंद्रपूर मार्गाचे विद्युतीकरण, दोन वर्षांपासून बांधून तयार असलेल्या गोंदिया रेल्वेस्थानकाबाहेरील मल्टीफंक्शनल मॉलचे लोकार्पण यासारख्या महत्वपूर्ण मागण्यांबाबत या अर्थसंकल्पात कोणताही विचार करण्यात आलेला नाही.
‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळात तरी या मागण्या निकाली निघतील, अशी अपेक्षा येथील नागरिकांची होती. त्यामुळेच सरकारच्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून येथील नागरिकांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र रेल्वेमंत्र्यांनी गोंदियावासीयांना निकाल करून त्यांचा अपेक्षाभंग केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)