जिल्ह्यात खरीप पिकाच्या मशागतीला आला वेग
By Admin | Updated: June 15, 2014 23:37 IST2014-06-15T23:37:08+5:302014-06-15T23:37:08+5:30
मागील वर्षी अतिवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. उन्हाच्या दाहकतेची पर्वा न करता शेतकऱ्यांची शेतातील लगबगही वाढली आहे.

जिल्ह्यात खरीप पिकाच्या मशागतीला आला वेग
गोंदिया : मागील वर्षी अतिवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. उन्हाच्या दाहकतेची पर्वा न करता शेतकऱ्यांची शेतातील लगबगही वाढली आहे. खरीप पिकाच्या मशातीची सर्वच कामे आता अंतिम टप्यात असून आता केवळ प्रतीक्षा पावसाची आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होते. मात्र, त्यानंतर पावसाने आपले उग्र रुप दाखविणे सुरू केले. गरज असताना पाऊस मुसळधार स्वरूपात अविरत पडतच राहिला. जुलै, आॅगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला होता. जिल्ह्यात तब्बल चार वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. खुद्द कृषिमंत्र्यांनाही जिल्हाचा दौरा करावा लागला होता. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार, २ लाख १६ हजार ४५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. अनेक शेतजमीन पार खरडून गेली आहे. अनेक ठिकाणी शेतीमध्ये तलावासारखे पाणी साचून होते. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना शेती करणे अशक्य झाले होते. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे घेतले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. अतिवृृष्टीची नोंद शासन दरबारीही घेण्यात आली. मात्र, शासनाची मदत शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकले नाही. त्यानंतर रबी हंगामातही पावसाने दगा दिला. ऐन पिक कापणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे पीक उध्दवस्त झाले. खरीपाचे कर्ज शेतकरी रबी हंगामातही फेडू शकला नाही.
निसर्गाची ही अवकृपा विसरुन शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरीपाची तयारी करीत आहे. शेतातील नांगरणी, वखरणीची कामे जवळजवळ आटोपत आली आहेत. शेतातील कचरा स्वच्छ झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेणखतही शेतात टाकले आहे. उन्हाची दाहकता असह्य होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच उन्हाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. यंदा कृषी विभागाने साडेचार लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ६० हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन १ लाख ४० हजार हेक्टर व सर्वात कमी कापूस १ लाख १० हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. बहुतांश शेतकऱ्यांची खरीप पिकासाठी मशागतीची कामे आटोपली आहेत. त्यामुळे शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
यंदा वरूणराजा कृपा करेल की अवकृपाच दाखवेल, हे येणारी वेळच सांगेल. मागील वर्षी घेतलेले कर्ज अनेक शेतकरी फेडू शकले नाही. आता खरीप हंगाम पुन्हा तोंडावर आला आहे. (तालुका प्रतिनिधी)