दुसऱ्या डोसकडे जिल्हावासीयांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST2021-08-24T04:32:46+5:302021-08-24T04:32:46+5:30
कपिल केकत गोंदिया : कोरोनापासून बचावासाठी जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम जोमात सुरू आहे. ...

दुसऱ्या डोसकडे जिल्हावासीयांचे दुर्लक्ष
कपिल केकत
गोंदिया : कोरोनापासून बचावासाठी जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम जोमात सुरू आहे. यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यात ५६ टक्के लसीकरण झाले असून, यामध्ये मात्र दुसरा डोस घेणारे फक्त १२ टक्के नागरिकच आहेत. यावरून दुसरा डोस घेण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र संपूर्ण सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेण्याची गरज असल्याने लवकरात लवकर दुसरा डोस घेण्याची गरज आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कहरानंतर जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय आता कोरोनाला मात देण्यासाठी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार, अवघ्या देशात लसीकरणाला घेऊन गांभीर्याने काम सुरू आहे. यामुळेच केंद्र व राज्य शासनाची प्रत्येकच जिह्यातील लसीकरणावर बारकाईने नजर आहे. परिणामी जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम जोमात सुरू असून, रविवारपर्यंत (दि. २२) ७२१०३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच आतापर्यंत जिल्ह्यातील ५६ टक्के नागरिकांचे लसीकरण आटोपले आहे. मात्र गंभीर बाब म्हणजे, जिल्ह्यातील ५६ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असतानाच यातील ५६०७४२ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, त्याची ४३ एवढी टक्केवारी आहे. तर १६०२९१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, त्याची फक्त १२ एवढी टक्केवारी आहे. ही आकडेवारी बघता नागरिक लसीकरणासाठी उत्साहात पुढे येत असून, दुसरा घेण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र त्यासाठी दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे, असे स्पष्टपणे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तरीही नागरिकांकडून बेजबाबदारपणा दाखविणे ही गंभीर बाब आहे.
---------------------------------
कोरोना गेला, आता लसीची गरज काय?
एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर एप्रिल व मे महिन्यात लसीकरणासाठी जिल्ह्यात सर्वत्र धावपळ उडाली होती. कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक लसीकरणासाठी धडपडत होते; मात्र आता जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आली असल्याने आता कोरोना तर गेला, मग लसीकरणाची गरज काय? असा सवाल नागरिक करीत आहेत. हेच कारण आहे की, पहिली लस घेतल्यानंतर आता दुसऱ्या डोससाठी नागरिक कारणे शोधत आहेत.
------------------------------
अशी आहे लसीकरणाची आकडेवारी
गट पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी १०२८१ ६१३८
फ्रंटलाईन वर्कर्स २४३१७ १२६६१
१८-४४ २३६१८७ ३८०७८
४५-६० १९१०५९ ३८७५७
६० प्लस ९८८९८ ३८७५७