जिल्ह्यातील आरोग्य सेवा ‘व्हेंटिलेटरवर’
By Admin | Updated: July 18, 2016 00:10 IST2016-07-18T00:10:00+5:302016-07-18T00:10:00+5:30
केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व त्या अधीनस्थ येणाऱ्या रूग्णालयांमध्ये वर्ग-१ ते ४ ची ९१३ पदे मंजूर आहेत.

जिल्ह्यातील आरोग्य सेवा ‘व्हेंटिलेटरवर’
वर्ग-१ ची २७ पदे रिक्त : एकूण ९१३ मंजूर पदांपैकी ३५१ पदे रिक्त
गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व त्या अधीनस्थ येणाऱ्या रूग्णालयांमध्ये वर्ग-१ ते ४ ची ९१३ पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी ३५१ पदांच्या खुर्च्या आजही रिकाम्याच असल्याने आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. या रिक्त पदांमुळे आरोग्य सेवाच ‘व्हेंटिलेटरवर’ असल्याचे दिसून येते.
गोंदिया जिल्हा, लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या काही भागातील रूग्ण उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात येतात. यात आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या गरीब वर्गातील रूग्णांचा समावेश असतो. मात्र याच रूग्णालयात वर्ग-१ ची १४ पदे रिक्त असल्यामुळे गरिबांच्या आरोग्याची समस्या ऐरणीवर आली आहे. शासन प्रभारींच्या भरवशावर कार्यभार सोपवून आपण आपली जबाबदारी सांभाळत असल्याचा आव आणतो. मात्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीच पुरेशी आरोग्य सेवा देण्यासाठी उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात आरोग्य सेवेचे बारा वाजले आहेत.
जिल्ह्यात वर्ग एकची ३५ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ आठ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. तर तब्बल २७ पदे रिक्त आहेत. यात केटीएस रूग्णालयात सर्वाधिक म्हणजे १४ पदे रिक्त आहेत. क्षय रूग्णालय एक पद रिक्त, गंगाबाई रूग्णालात दोन पदे रिक्त आहेत. तर देवरी, चिचगड, अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध, सडक-अर्जुनी, सालेकसा, आमगाव, गोरेगाव, रजेगाव, सौंदड या १० ग्रामीण रूग्णालयांतही वर्ग-१ ची पदे मंजूर असूनही ते रिक्तच आहेत. त्यामुळे प्रशासनाला वर्ग-१ चे अधिकारी मिळेनासे झाले काय? असा सवाल उभा ठाकतो.
तसेच जिल्ह्यात वर्ग-२ ची १६ पदे रिक्तच आहेत. यात केटीएस रूग्णालय, बाई गंगाबाई, क्षय रूग्णालय व तिरोडा उपजिल्हा रूग्णालय यामध्ये नऊ पदे रिक्त आहेत. तसेच चिचगड, अर्जुनी-मोरगाव, नवेगाव, सडक-अर्जुनी, सालेकसा, आमगाव, गोरेगाव या ग्रामीण रूग्णालयांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे वर्ग-२ ची पदे रिक्त आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असणे म्हणजे आजारांनाच वाव देण्यासारखे आहे. मात्र आरोग्य प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे ‘इमरजंसी सर्व्हिस’ म्हणून आधी रिक्त पदांची भरती करून उत्तम आरोग्य सेवा पुरविणे सद्यस्थितीत अत्यावश्यक आहे.
याशिवाय वर्ग-३ ची एकूण ५०६ पदे मंजूर असताना केवळ ३५८ पदांवरच कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल १४७ रिक्त पदांना कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आहे. तर वर्ग-४ ची एकूण २८३ पदे मंजूर असून १६१ पदे रिक्तच पडून आहेत.
वर्ग-१, २ व ३ ची सर्वाधिक पदे रिक्तच आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनालाच आरोग्य सेवेची गरज आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. (प्रतिनिधी)