जिल्हा बँकेने केले १०८ टक्के कर्जवाटप
By Admin | Updated: August 21, 2015 02:12 IST2015-08-21T02:12:17+5:302015-08-21T02:12:17+5:30
ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिकचे कर्जवाटप करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एकदा शेतकऱ्यांची हितचिंतक असल्याचे सिद्ध झाले आहे.

जिल्हा बँकेने केले १०८ टक्के कर्जवाटप
शेतकऱ्यांना दिलासा : उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप
गोंदिया : ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिकचे कर्जवाटप करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एकदा शेतकऱ्यांची हितचिंतक असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्हा बँकेने १०८ टक्के खरिप हंगामाचे कर्जवाटप केले असून अजूनही कर्जवाटप सुरूच आहे. जिल्हा बँकेने या हंगामात ९५ कोटी ४७ लाख ६५ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे.
जिल्ह्याला धानाचे कोठार अशी ख्याती देण्यात असली तरीही येथील शेतकऱ्यांची वास्तविक स्थिती कुणापासून लपलेली नाही. निसर्गाची अवकृपा यात महत्वपूर्ण कारण असल्याचे दिसून येते. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. परिणामी येथील शेतकऱ्याला कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. यासाठी बँकांचे उंबरठे झिजविणे त्यांच्या नशिबीच लागले आहे. तर शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक ऱ्यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते.
राष्ट्रीयकृत व खाजगी बँकाच काय तर सहकारी व ग्रामीण बॅकांनाही कर्ज वाटपाचे निकष लागू पडतात. हे असले तरिही कर्जवाटपात जिल्हा बँक नेहमी अगे्रसर राहत असल्याचे दिसून येते. यातून शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवरील विश्वास तसेच जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांप्रती असलेला आत्मीयतेचा भाव दिसून येतो. परिणामी जिल्हा बँक ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक प्रमाणात कर्जवाटप करीत असते. यंदाही जिल्हा बँकेने ठरवून दिलेले उद्दीष्ट गाठले असूनही आता त्यापलीकडे कर्जवाटप करीत आहे यंदा जिल्हा बँकेला ८८ कोटी ६३ लाख रूपये कर्जवाटपाचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेने उद्दीष्ट पूर्ती केली असून ३२३ संस्था, ३० हजार ४१६ सभासद व ८८ हजार ११३ आराजी करिता ९५ कोटी ४७ लाख ६५ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे. याची चक्क १०८ एवढी टक्केवारी आहे. विशेष कर्जासाठी आजही शेतकरी येत असल्याने त्यांना परतावून न लावता कर्ज दिले असल्याचे जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी द्विवेदी यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)