रबीच्या कर्जवाटपातही जिल्हा बँक आघाडीवर
By Admin | Updated: February 3, 2015 22:56 IST2015-02-03T22:56:37+5:302015-02-03T22:56:37+5:30
गोंदिया- शेतकऱ्यांसाठी ठरवून देण्यात आलेल्या पीक कर्जवाटपात खरीपाप्रमाणेच रबीच्या वाटपातही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक कर्जवाटप करून आघाडी घेतली आहे.

रबीच्या कर्जवाटपातही जिल्हा बँक आघाडीवर
२१.३५ कोटींचे वाटप : उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू
गोंदिया : गोंदिया- शेतकऱ्यांसाठी ठरवून देण्यात आलेल्या पीक कर्जवाटपात खरीपाप्रमाणेच रबीच्या वाटपातही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक कर्जवाटप करून आघाडी घेतली आहे. दिलेले उद्दीष्ठ गाठण्याकडे जिल्हा बँकेची वाटचाल सुरू आहे. येत्या काही दिवसांत त्यांची उद्दीष्टपूर्ती होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
जिल्ह्यात रबी हंगामात ६८.७३ कोटी कर्जवाटपाचे लक्ष्य सर्व बँकांना दिले होते. त्यात जिल्हा बँकेला ३५.६२ कोटींचे उद्दीष्ट होते. ३१ डिसेंबरपर्यंत त्यापैकी २१ कोटी ३५ लाखांचे कर्जवाटप जिल्हा बँकेने केले आहे.
जिल्हा धानाचे कोठार म्हणून ख्यातनाम असला तरिही निसर्गाची मार बसत असल्याने येथील शेतकरी पाहिजे तेवढा धनसंपन्न झालेला नाही. परिणामी येथील शेतकऱ्याला कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. यासाठी बँकांचे उंबरठे झिजविणे त्यांच्या नशिबीच लागले आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक ऱ्यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते.
राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे काय तर सहकारी व ग्रामीण बॅकांनाही कर्ज वाटपाचे निकष लागू पडतात.
येथे विशेष बाब अशी की, कृषी कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत व खाजगी बँकापेक्षा जिल्हा बँक नेहमीच अग्रणी असल्याचे निदर्शनास येते. त्याचे असे की, राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांना सन २०१४-१५ मधील खरिप हंगामासाठी ४६८२ लाखांचे तर रबी हंगामासाठी २००६ लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. यात या बँकांकडून खरिपात सहा हजार ७० खातेधारकांना ३६८७ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. रबीत २५९ खातेधारकांना १९२ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.
ग्रामीण बँकांत बघायचे झाल्यास फक्त विदर्भ कोंकण ग्रामीण बँक कार्यरत असून त्यांना खरिपाचे ३०४४ लाखांचे तर रबीचे १३०५ लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट आहे. यात ग्रामीण बँकेने खरिपात चार हजार ८०० खातेधारकांना २३०१ लाखांचे तर रबीत १३५ खातेधारकांना ८१ लाखांचे कर्जवाटप केले आहे.
कर्जवाटपाच्या या कारभारात येथील जिल्हा मध्यवर्ती बँक अग्रणी दिसून येत आहे. त्याचे असे की, जिल्हा बँकेला खरिपात ८३१३ लाखांचे तर रबीत ३५६२ लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात जिल्हा बँकेने खरिपात २९ हजार ५२३ खातेधारकांना ९४१४ लाखांचे कर्जवाटप केले आहे. म्हणजेच दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्तीचे कर्जवाटप करण्यात आले आहे. शिवाय रबीसाठी आतापर्यंत ६२ खातेधारकांना २१३५ लाखांचे कर्जवाटप बँकेने केले आहे.
रबीच्या हंगाम सुरूवातीत असल्याने येत्या काही दिवसांत बँकेची उद्दीष्टपूर्ती होणार यात शंका दिसून येत नाही. (शहर प्रतिनिधी)
राष्ट्रीयकृ त बँका माघारल्या
कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बँकाही सहभागी झाल्याचे दिसते. यात बँक आॅफ इंडियाने खरिपात १६३६ लाखांपैकी १२०२ लाखांचे तर रबीत ७०१ लाखांपैकी ८० लाखांचे कर्जवाटप केले आहे. बँक आॅफ महाराष्ट्रने खरिपात १०८४ लाखांपैकी ६९२ लाखांचे कर्जवाटप केले आहे. तसेच स्टेट बँक आॅफ इंडियाने खरिपात ७६८ लाखांपैकी ६७१ लाखांचे कर्जवाटप केले आहे. त्यानंतर अन्य बँकांचाही कमीप्रमाणात कर्जवाटपात सहभाग आहे.
१४३९.४६ लाखांची वसुली
जिल्हा बँकेला २४५७१.५७ लाख रूपयांची थकीत तर १००२९.७१ लाखांची चालू अशाप्रकारे एकूण ३४६०१.२८ लाखांची कर्जवसुली करायची होती. त्यातील १२९८.०८ लाख रूपयांची मुद्दल तर १४१.३८ लाखांचे व्याज अशाप्रकारे एकूण १४३९.४६ लाखांची वसुली जिल्हा बँकेने केली आहे. वरिल आकडेवारी ३० जानेवारी पर्यंतची आहे.