आठ महिन्यांत १५ क्षय रूग्णांचा मृत्यू
By Admin | Updated: December 18, 2014 22:57 IST2014-12-18T22:57:21+5:302014-12-18T22:57:21+5:30
जिल्ह्यात क्षयरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत १५ लोकांचा मृत्यू क्षयरोगाने झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांत झालेल्या

आठ महिन्यांत १५ क्षय रूग्णांचा मृत्यू
गोंदिया : जिल्ह्यात क्षयरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत १५ लोकांचा मृत्यू क्षयरोगाने झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांत झालेल्या विविध तपासणीतून सदर संख्या उपलब्ध झाली आहे.
या कालावधीत गोंदिया जिल्ह्यात क्षयरोग कॅट-१ चे ६५० रूग्ण, कॅट-२ चे १२७ रूग्ण, एमडीआरचे ७१ रूग्ण व एक्सडीआरचा एक रूग्ण आढळला आहे. एमडीआर व एक्सडीआर क्षयरोग अत्यंत धोकादायक व जीवघेणा असतो. एमडीआर क्षयरोगाच्या ७१ रूग्णांपैकी १५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ११ रूग्ण औषधी सेवनात अनियमित आढळले आहेत. त्यातच १३ रूग्णांच्या स्थितीत सुधारणा झालेला आहे. तसेच सहा रूग्णांवर औषधोपचाराचा काहीही प्रभाव झाला नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विनोद वाघमारे यांनी सांगितले की, अशा रूग्णांवर उपचारादरम्यान काहीही प्रभाव होत नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर औषधीसुद्धा काहीही काम करीत नाही.
त्यामुळे अशा रूग्णांना तीच औषधी उपलब्ध करून देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. एमडीआरच्या रूग्णांपैकी दोन रूग्ण असे आहेत की ते तपासणीसाठी थुंकीचे नमुणेसुद्धा देत नाहीत.
यापैकी एक रूग्ण जिल्ह्याबाहेरील आहे. तर दुसरा रूग्ण एक्सडीआरमध्ये बदललेला असून २२ रूग्णांवर उपचार सुरू आहे. (प्रतिनिधी)