शासन आणि प्रशासनाच्या समन्वयातून जनतेचा विकास
By Admin | Updated: June 20, 2016 01:34 IST2016-06-20T01:34:33+5:302016-06-20T01:34:33+5:30
जनसामान्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शासनाकडून अनेक प्रकारच्या लोकोपयोगी योजना तयार केल्या जातात.

शासन आणि प्रशासनाच्या समन्वयातून जनतेचा विकास
संजय पुराम : सालेकसा येथे महाराजस्व अभियान
सालेकसा : जनसामान्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शासनाकडून अनेक प्रकारच्या लोकोपयोगी योजना तयार केल्या जातात. परंतु त्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याचे काम हे प्रशासनाचे असते. कुठेतरी कमीपणा आल्यास चांगल्या योजनासुद्धा अयशस्वी ठरतात. त्यांच्या लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे शासन आणि प्रशासन यांच्यात योग्य समन्वय राखून योजनांची अंमलबजावणी केल्यास जनतेचा विकास होणारच, असे मत आमगाव क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी केले.
सालेकसा येथे महाराजस्व अभियानांतर्गत तालुकास्तरीय समाधान योजना शिबिरात अध्यक्षीय मार्गदर्शनात ते बोलत होते.
तहसील कार्यालय सालेकसा येथील प्रांगणात घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियान शिबिराच्या अध्यक्षपदी आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, जि.प. सदस्य लता दोनोडे, जि.प. सदस्य विजय टेकाम, पं.स. उपसभापती राजकुमारी विश्वकर्मा, तहसीलदार प्रशांत सांगळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष इसराम बहेकार, रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष खेमराज लिल्हारे, तालुका भाजप अध्यक्ष परसराम कुंडे, तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, माजी पं.स. सदस्या संगीता शहारे, लक्ष्मण सोनसर्वे व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विविध विभागाकडून लावण्यात आलेल्या माहितीदर्शक स्टॉलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी महसूल विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, वन विभाग, समाजकल्याण विभाग, परिवहन विभाग, शिक्षण, महाराष्ट्र बँक, पशुधन विभाग, पोलीस विभाग, एकात्मिक बाल विकास व इतर विभागांकडून स्टॉल लावून माहिती पत्रक देत योजनांची माहिती सादर केली जात होती. या सर्व विभागांची आ. पुराम यांनी माहितीची चौकशी केली व त्यांची अंमलबजावणी कशाप्रकारे व किती प्रमाणात करण्यात आली, याबद्दल अद्ययावत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
सर्व मान्यवर स्थानापन्न झाल्यावर त्यांना बॅचेस लावल्यानंतर सर्वांना रोपटे देऊन स्वागत करण्याची अभिनव परंपरा सुरू करण्यात आली. पुष्पगुच्छऐवजी रोपटे स्वीकारण्याचा आनंद सर्व मान्यवरांनी अनुभवला.
आपल्या प्रास्ताविकात नायब तहसीलदार आर.एम. कुंभरे यांनी सालेकसा तालुक्याची वैशिष्ट्यपूर्ण अद्ययावत माहिती सादर केली. केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजनांची सविस्तर माहिती देत लोकांनी शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आ. पुराम यांनी सर्वच विषयांना स्पर्श करीत त्या-त्या विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे जनतेची कामे करावी, असे आवाहन केले. याप्रसंगी जि.प. सदस्या दुर्गा तिराले व लता दोनोडे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. गणेश भदाडे आणि विजय मानकर यांनी केले. आभार तलाठी आर.एम. ठाकरे यांनी केले.
कार्यक्रमासाठी तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या मार्गदर्शनात आर.एम. कुंभरे, बारसागडे, बारसे, एम.बी. रघुवंशी, के.बी. शहारे, डी.टी. हत्तीमारे, एस.टी. बागळे, आर.एन. काकडे, मेश्राम, वालोदे, फटींग, पंधरे, राऊत, बघेले, वरखडे, कळंबे, राऊत, ब्राह्मणकर, नागपुरे, बागळे, तुरकर, राव यांनी सहकार्य केले.
(तालुका प्रतिनिधी)