इच्छा असूनही अनेकांना पर्यटन भ्रमंती अशक्य
By Admin | Updated: May 22, 2014 01:12 IST2014-05-22T01:12:16+5:302014-05-22T01:12:16+5:30
धकाधकीच्या जीवनात कामाचे टेंशन आणि कुटुंबातील अंतर्गत कलहातून बाहेर पडण्यासाठी

इच्छा असूनही अनेकांना पर्यटन भ्रमंती अशक्य
धकाधकीच्या जीवनात कामाचे टेंशन आणि कुटुंबातील अंतर्गत कलहातून बाहेर पडण्यासाठी अनेकजण आनंदाचे क्षण शोधत असतात. पर्यटनातून आनंद मिळविण्यासाठी अनेकांचा खटाटोप सुरू असतो. परंतु पर्यटन भ्रमंतीबाबत जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक फारसे उत्साही दिसत नाहीत. व्यापारी व नोकरदार वर्गातील लोक वगळले तर बहुतांश लोक पोट भरण्याच्या धडपडीतच व्यस्त असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले. जिल्ह्यात अनेक जण गर्भश्रीमंत असले तरी बहुतांश लोक सर्वसामान्य आणि गरीब आहेत. गरीब लोक पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस आटापिटा करीत असतात. जेवणाची सोय नाही तर पर्यटनाचा आनंद कसा लुटणार या मानसिकतेत जिल्ह्यातील बहुतांश जनता आहे. जिल्ह्यातील नागरिकांची पर्यटनाविषयी किती ओढ आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला. गोंदिया शहरात केलेल्या या सर्वेक्षणात फक्त ५ ते १0 टक्केच लोक वर्षातून एकदा किंवा दोन वेळा पर्यटनाला जातात. या पर्यटन भ्रमंतीला वैयक्तिक किंवा मित्र मैत्रिणींसोबत जाण्यापेक्षा सहकुटुंब पर्यटनाला जाणार्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५0 हजारांपेक्षा अधिक असली तरी वर्षाकाठी फक्त २0 हजार लोकच पर्यटन भ्रमंती करीत असल्याचे नोंद शहरातील ट्रॅव्हल्स एजंटकडून मिळाली. या २0 हजार पर्यटकांमध्ये सर्वाधिक नोकरदार वर्ग तर दुसर्या क्रमांकावर व्यापारी वर्ग आहे. नागझिरा, गायमुख, रामटेक, चांदपूर, गांगुलपारा, मांडोदेवी, नवेगावबांध, प्रतापगड, हाजराफॉल, दरेकसा, बावनथडी प्रकल्प, गोसेखुर्द आदी ठिकाणी जात आहेत. फक्त १0 टक्के लोक पर्यटनाला जात आहेत. कधी कधी पर्यटन भ्रमंतीला जातो म्हणणारे लोक ३0 टक्के तर ४0 टक्के लोक पर्यटन भ्रमंती करीत नसल्याचे सर्वेक्षणात आढळले. पर्यटनासाठी किती दिवस घालवता, या प्रश्नावर दोन ते तीन दिवस घालविणारे २0 टक्के, आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक वेळासाठी १ टक्के तर ७९ टक्के लोक एक दिवसाचीच पर्यटन भ्रमंती करतात. पर्यटनाला कुणासोबत जाता? या प्रश्नावर ७0 टक्के लोकांनी कुटुंबासह पर्यटन भ्रमंती करीत असल्याचे सांगितले. २0 टक्के मित्र-मैत्रिणीसोबत तर १0 टक्के लोक एकटेच जात असल्याचे सर्वेक्षणात आढळले.