तरुणीचा मृत्यू, व्यापाऱ्याची हत्या गुलदस्त्यात
By Admin | Updated: March 26, 2015 01:12 IST2015-03-26T01:12:37+5:302015-03-26T01:12:37+5:30
फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यातील दोन मोठ्या घटनांनी आमगाव तालुका हादरून गेला आहे.

तरुणीचा मृत्यू, व्यापाऱ्याची हत्या गुलदस्त्यात
आमगाव : फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यातील दोन मोठ्या घटनांनी आमगाव तालुका हादरून गेला आहे. एका घटनेत शिवनी येथील तरुणीचा मृतदेह रेल्वे रूळावर संशयास्पदरित्या आढळला तर दुसऱ्या घटने बिर्शी येथील तरुण व्यापाऱ्याची हत्या झाली. मात्र दोन्ही घटनेचा छडा लावण्यात आमगाव पोलिसांना यश आले नाही.
शिवनी येथील शाळकरी मुलीचा मृत्यू फेब्रुवारी महिन्यात झाला. त्या मुलीच्या मृत्यूमागे नेमके कारण काय याचा छडा पोलीस लावू शकले नाही. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बिर्शी येथील किराणा व्यापाऱ्याचा खून झाला. दोन्ही प्रकरणे गुुलदस्त्यात आहेत.
शाळकरी मुलीचा मृतदेह जवरी परिसरातील रेल्वे रूळावर आढळला. जर ती मुलगी रेल्वेने मरण पावली तर तिचे शरीर छिन्नविछिन्न झाले असते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. गावात व परिसरात नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा आहे. चार वर्षापूर्वी अशाच प्रकारची घटना एका शाळकरी मुलीच्या संदर्भात घडली होती. नागरिक समोर येऊन बोलत नसले तरी शिवनी येथील मुलीचा मृत्यू रेल्वेने कटून झालेला नसून त्यामागे नेमके कोणते तरी रहस्य असल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांकडून तपासाच्या नावावर केवळ भुलथापा देणे सुरू आहे. त्यामुळे आरोपींना संरक्षण देण्याची तर पोलिसांची भूमिका नाही ना, अशी शंका नागरिक घेऊ लागले आहेत.
१७ मार्चला बिर्शी येथील किराणा दुकानदाराची त्यांच्याच घरात हत्या झाली. चौकशीच्या नावावर गावातील शेतकरी-शेतमजुरांना उचलून त्यांची झाडाझडती सुरू आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी याप्रमाणे पोलिसाचे काम सुरू आहे. किराणा दुकानदार आपल्या घरी एकटेच राहत होते. गावात त्यांच्या चारित्र्यावर एक शब्दही कोणी बोलायला तयार नाही. एवढी त्याने आपली प्रतिमा बनवून ठेवली अशी गावात चर्चा आहे. मग अशा व्यक्तीची हत्या किंवा खून का झाला? एक तर यातील नेमके उत्तर म्हणजे त्या दुकानदाराजवळील अनुभवी व जाणकार व्यक्तीचा कदाचित सहभाग असावा.
एकतर चोरीच्या उद्देशाने आरोपी घरात गेले असतील, मात्र यात एका व्यक्तीचा सहभाग नाही. दुसरा मुद्दा म्हणजे त्याच्या घरी जाऊन त्याचा खून झाला त्यावेळी त्या इंदलाल लालवानीने बचावासाठी आरडाओरड केली असावी किंवा मारेकऱ्यांनी मारले तेव्हा इंदलाल मरण पावला नव्हता. त्यानंतर सुध्दा मदतीसाठी तो ओरडला असावा. मात्र त्याचा आवाज घराजवळील कुणापर्यंत कसा पोहचला नाही किंवा आवाज पोहोचून परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात का दिला नाही? अशाप्रकारे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र आमगाव पोलिसांच्या हाती अजून काहीही लागले नाही.
दोन महिन्यात दोन घटना घडल्या असताना पोलीस केवळ भूलथापा देऊन केवळ वेळकाढूपणा दाखवत आहे. दोन्ही तपास गुलदस्त्यात असत्याने अनेक तर्कविकर्ताना ऊत आला आहे. (तालुका प्रतिनिधी)