भरदिवसा झालेल्या हत्या व चोरीचा गुंता सुटणार
By Admin | Updated: August 27, 2015 01:59 IST2015-08-27T01:59:52+5:302015-08-27T01:59:52+5:30
येथील कापगते कॉम्प्लेक्सजवळील व्यापाऱ्याच्या घरात दिड महिन्यापूर्वी भरदिवसा घडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना मंगळवारी रात्री ...

भरदिवसा झालेल्या हत्या व चोरीचा गुंता सुटणार
दोन आरोपींना अटक : बहुचर्चित नीतू पशिने हत्या प्रकरण
अर्जुनी-मोरगाव : येथील कापगते कॉम्प्लेक्सजवळील व्यापाऱ्याच्या घरात दिड महिन्यापूर्वी भरदिवसा घडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना मंगळवारी रात्री अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अटक केली. या आरोपींना बुधवारी स्थानिक दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे गूढ होत गेलेल्या या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. ही जाणीवपूर्वक केलेली हत्या आहे, की चोरीतून झालेली हत्या, याबाबत नागरिकांमध्ये असलेल्या चर्चेला आरोपींच्या कबुलीजबाबातून पूर्णविराम मिळणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक व्यापारी सुरेश पशिने यांच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून त्यांची पत्नी नीतू यांची ९ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. नेहमी वर्दळ असलेल्या कापगते कॉम्प्लेक्सजवळील त्यांच्या घरी भरदिवसा झालेल्या हत्येचे आव्हान अर्जुनी मोरगाव पोलिसांसमोर होते. तपासाला दिशा मिळावी म्हणून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने काही अंतरापर्यंतचा मार्ग दाखविला होता. परंतू पोलिसांना त्यातून फारसे काही हाती लागले नाही. या प्रकरणाने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली होती.
या हत्येच्या तपासासाठी सीआयडी, स्थानिक गुन्हे शाखा, याशिवाय स्थानिक पोलिसांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरली. आरोपींनी कसलेही पुरावे न सोडल्यामुळे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले होते. अखेर तब्बल ४८ दिवसानंतर आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रन्नावरे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सहा. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, राजेश गज्जल, उपनिरीक्षक साळुंके, सहा. उपनिरीक्षक नवखरे, लुटे, थेर, शिंदे, मेहर, गिरी, मुळे, बिल्लोरे, फुलबांधे यांनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)
भंडाऱ्यात अटक, नावांबाबाबत गुप्तता
ज्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली त्याच आरोपींनी काही दिवसांपूर्वी भंडारा येथील एका महिलेची हत्या करून दोघांना जबर दुखापत केल्याचे समजते. आरोपींनी नीतू पशिने यांच्या हत्येची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तपासकामी व्यत्यय येऊ नये म्हणून पोलिसांनी आरोपींच्या नावाबद्दल गुप्तता बाळगली आहे. त्यामुळे या तपासामध्ये बऱ्याच बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तूर्तास या हत्येचा छडा लागल्यामुळे पोलिसांसह नागरिकांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.