क्रीडांगणाअभावी खेळाडूंची कुचंबना
By Admin | Updated: May 2, 2015 01:42 IST2015-05-02T01:42:37+5:302015-05-02T01:42:37+5:30
जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींमधील कलागुण विकसित करण्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे...

क्रीडांगणाअभावी खेळाडूंची कुचंबना
गोंदिया : जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींमधील कलागुण विकसित करण्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे ती सुसज्ज क्रीडांगणाची. ती उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंची कुचंबना होत आहे, अशी खंत ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक मुकेश बारई यांनी व्यक्त केली. बारई यांना महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेकडून उत्कृष्ट जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार देऊन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते गौरवित करण्यात आले.
यानिमित्त जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या वाटचालीवर आणि भविष्यातील विकासावर त्यांनी ‘लोकमत’कडे आपले मनोगत व्यक्त केले. पाच विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेले बारई गेल्या ३५ वर्षांपासून क्रीडा क्षेत्राशी जुळलेले आहेत. व्यवसायाने ते व्यापारी असले तरी त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यामुळेच त्यांना शुक्रवारी शासनाकडून गौरविण्यात आले. विदर्भ बुद्धीबळ असोसिएशनचे चार वर्ष उपाध्यक्ष आणि आता गोंदिया जिल्हा क्रिकेट असोसिएशन व गोंदिया जिल्हा बुद्धीबळ असोसिएशनचे ते सचिव आहेत. याशिवाय पूर्व विदर्भातील राज्यस्तरिय क्रिकेट अंपायरची परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिले अंपायर आहेत. बुद्धीबळात त्यांनी आॅल इंडिया कलर होल्डर, तर क्रिकेटमध्ये ते विदर्भस्तरिय स्पर्धांमध्ये खेळले आहेत.
बुद्धीबळ आणि क्रिकेटमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंना पुढे येण्यासाठी मुकेश बारई यांचे सतत मार्गदर्शन असते. खेळाडूंना चांगला सराव होऊन स्पर्धांची सवय व्हावी यासाठी ते जिल्ह्यात विविध स्पर्धा आयोजित करीत असतात.
खेळाडूंना पुढे येण्यासाठी औद्योगिक स्पॉन्सरशिप जिल्ह्यात नाही. त्यामुळे सर्व स्तरातील खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळत नाही. त्यासाठी लागणारा पैसा प्रत्येकाकडे नसतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रीडांगण आहे. जिल्ह्यात मोकळ्या जागा भरपूर आहेत. पण त्या झुडूपी जंगलात मोडतात. त्यामुळे वन कायद्यानुसार त्यातील एक इंचही जागा मिळत नाही. शासनाने क्रीडा प्रेमींसाठी ही अट शिथिल करून क्रीडांगणासाठी त्या जागा द्याव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आता गोंदियात नाही आमगाव, तिरोडा येथेही बारई यांनी प्रशिक्षण सुरू केले आहे. राज्य शासनाकडून तालुका स्तरावर क्रीडांगण उभारले जात आहेत. मात्र ते क्रिकेटसाठी पुरेसे नाहीत. क्रिकेटच्या मैदानाएवढी जागा त्या क्रीडांगणात नसते. ते केवळ देशी खेळांसाठी कामात येईल, असे बारई यांनी सांगितले.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) मोठी संस्था आहे. मात्र जिल्हास्तरावर त्यांच्याकडून कोणतेही आर्थिक सहकार्य मिळत नाही. त्यामुळे शासनानेच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि ग्रामीण खेळाडूंना पुढे आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे बारई यांना वाटते. गेल्या पाच वर्षात विदर्भ क्रिकेट टीममध्ये (अंडर १९) चार-पाच खेळाडू खेळत आहेत. बुद्धीबळात अनेक नवीन खेळाडू पुढे येत आहेत. जिल्ह्यात क्रिकेटसारख्या खेळासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि खेळाडूंना राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविणे हे आपले ध्येय आहे असे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)