कोरोनामुक्त गावात शाळांची घंटा वाजली पण उपस्थिती मोजकीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST2021-07-30T04:31:14+5:302021-07-30T04:31:14+5:30
केशोरी : महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार कोरोनामुक्त गावातील शाळा वर्ग आठवी ते बारावीपर्यंतचे अटी व शर्तीच्या ...

कोरोनामुक्त गावात शाळांची घंटा वाजली पण उपस्थिती मोजकीच
केशोरी : महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार कोरोनामुक्त गावातील शाळा वर्ग आठवी ते बारावीपर्यंतचे अटी व शर्तीच्या आधीन राहून १५ जुलैपासून सुरु झाल्या आहेत. ग्रामपंचायतीचा ठराव व पालकांचे संमतीपत्र घेवून शाळा सुरु झाल्या असल्या तरीही आदिवासी व ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी उपस्थिती नगण्य दिसून येत आहे.
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शाळांची घंटा वाजल्याने काही विद्यार्थी आनंदाने येतात तर काही विद्यार्थी घरीच राहून आई-वडीलांच्या व्यवसायात मदत करीत आहे. महाराष्ट्रातील शाळा २० मार्च २०२० पासून कोरोना विषाणूच्या संकटामुळे बंद होत्या. शहराप्रमाणे खेड्यांनीही कोरोना महामारीचा अनुभव घेतला आहे. कोरोना भीतीमुळे कोणीही घराबाहेर पडत नव्हते. सर्व विद्यार्थी भयभीत होवून घरातच बंदीस्त झाली होती. यामुळे शिक्षणाचे तंत्र बिघडले होते. शासनाने शैक्षणिक नुकसान भरुन काढण्याचे दृष्टीने ऑनलाईन शिक्षण प्रणाली अंमलात आणली आहे. परंतु आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रभावी ठरु शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आहे. कोरोना महामारीचा प्रभाव कमी होताच ग्रामपंचायतीचा ठराव व पालकांचे समंती पत्र घेवून कोरोनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतींनी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेवून ठराव शाळांना पाठविण्यात आले. बऱ्याच दिवसानंतर शाळेची घंटा विद्यार्थ्यांच्या कानावर पडली. पहिल्याच दिवशी बंदीस्त विद्यार्थी घराबाहेर पडल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आले होते. या भागातील शाळा सुरु होवून पंधरा दिवस होत आहेत. परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच आहे.
.................
मुले करीत आहेत आईवडिलांना मदत
कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी आपल्या आई-वडीलांच्या व्यवसायात मदत करीत असून अजून ही तेच सुरु आहे. म्हणून शाळेत विद्यार्थी उपस्थिती फारच अल्प दिसून येत असल्याचे सांगण्यात आले. शाळेत सुरक्षितता बाळगून उपस्थित होत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपापल्या बाकावर विराजमान झालेल्या विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर शाळा चालू झाल्याचे आनंदी हास्य दिसून येत आहेत.