काँग्रेसला घ्यावी लागणार मेहनत
By Admin | Updated: June 8, 2014 23:57 IST2014-06-08T23:57:01+5:302014-06-08T23:57:01+5:30
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत गोंदिया विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. सलग दुसर्यांदा या मतदार संघातून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार

काँग्रेसला घ्यावी लागणार मेहनत
मनोज ताजने - गोंदिया
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत गोंदिया विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. सलग दुसर्यांदा या मतदार संघातून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार झाले आहेत. परंतू आता परिस्थिती बरीच बदलली आहे. काँग्रेसचीच नाही तर सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदार संघावर पकड राहिलेली नाही, हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. दुसरीकडे भाजपची पकड वाढली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना गोंदिया विधानसभा मतदार संघात ८४ हजार मतांची आघाडी होती. त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड मानला जात होता. यावेळी ही मतांची आघाडी पूर्णपणे संपुष्टात येऊन भाजपच्या नाना पटोले यांनी या मतदार संघातून ५१0७ मतांची आघाडी घेतली. म्हणजेच गतवेळेच्या तुलनेत जवळपास ९0 हजार मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
हे परिवर्तन एकाएकी झाले किंवा केवळ ‘मोदी लाटे’मुळे झाले असेही म्हणता येणार नाही. साधारण अडीच वर्षापूर्वी झालेल्या गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवत ४0 पैकी १६ जागा जिंकल्या. शिवसेनेचेही ३ नगरसेवक निवडून आले.
याचवेळी राष्ट्रवादीला ११ तर काँग्रेसला अवघ्या ८ जागांवर समाधान मानावे लागले. दोन अपक्ष उमेदवारांच्या मदतीने काँग्रेस-राकाँने नगर परिषदेवर सत्ता काबीज केली असली तरी मतदारांचा कौल भाजपच्या बाजुने झुकल्याचे या निवडणुकीने सिद्ध केले. त्यानंतरही गोंदिया शहरातील आणि या मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा, विकासात्मक कामांना मार्गी लावण्याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून झालेले दुर्लक्ष विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी इमानदारीने काम केले नसल्याची कुजबूज होती. त्याचा वचपा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
असे असले तरी विरोधकांसाठी ही निवडणूक सोपी आहे असेही नाही. भाजप-सेनेच्या युतीत ही जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे. दोन वेळा शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देणार्या या मतदार संघाने गेल्या सलग दोन निवडणुकीत पराभवही चाखायला लावला. शिवाय गेल्या पाच वर्षात शिवसेनेने पक्षवाढीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाही. त्यामुळे भाजप आपली या मतदार संघावरील पकड वाढल्याचा दावा करीत शिवसेनेकडून हा मतदार संघ आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे झाल्यास भाजपकडून या मतदार संघात कोणाला तिकीट मिळेल यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. कारण या मतदार संघात भाजपकडून लढण्यास इच्छुक असणार्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी एखाद्याची नाराजी किंवा बंडखोरी या पक्षाला मारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व जर-तरच्या गोष्टी असल्या तरी आजच्या परिस्थिीतीत काँग्रेससाठी या मतदार संघात पोषक वातावरण राहिलेले नाही, हे मात्र मान्य करावेच लागेल.