लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोसेखुर्द प्रकल्प पूर्व विदर्भातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून जास्तीत जास्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ व्हावा, जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी सिंचन प्रकल्पाबाबतची भूसंपादनाची कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलसंपदा विभागाच्या धारगाव, गणेशपूर, सांगवारीमध्ये नवीन सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीसोबत गोसेखुर्द, बावनथडी प्रकल्पावरही चर्चा करण्यात आली. सर्व सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी जयंत पाटील यांनी दिले.
नवीन प्रकल्प आणि अपूर्ण प्रकल्पाच्या कामाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांना धारगाव, गणेशपूर, सांगवारी येथील नवीन योजनांची माहिती देण्यात आली. महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द व बावनथडी प्रकल्पावरही चर्चा करून जिल्ह्यातील सिंचन योजनांची माहिती पाटील यांनी घेतली. जिल्ह्यातील करचखेडा, सुरेवाडा, धारगाव, गणेशपूर येथील उपसा सिंचन योजना तत्काळ पूर्ण करण्यासोबतच भोजापूर येथील वाॅल कंपाऊंडचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. भूसंपादनाचे विविध प्रकरणे प्रलंबित असून ते तातडीने सोडविण्यासाठी जलसंपदा व महसूल विभागाने विशेष मोहीम राबवावी अशी सूचना त्यांनी केली. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, विलास श्रुंगारपवार, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, देवेंद्रनाथ चौबे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पडोळे, अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.के. मानवटकर उपस्थित होते.