स्वच्छता मोहिमेने गावकरीही झाले जागरूक
By Admin | Updated: October 29, 2014 22:51 IST2014-10-29T22:51:24+5:302014-10-29T22:51:24+5:30
गावाच्या वेशीवरून गावातील स्वच्छतेबाबात मत बदलते. उघड्यावर शौचास गेल्यास त्यामुळे अनेक आजार जडू शकतात. वैयक्तिक स्वच्छता पाळल्यास आपल्याबरोबरच इतरांचे देखील आरोग्य

स्वच्छता मोहिमेने गावकरीही झाले जागरूक
गोंदिया : गावाच्या वेशीवरून गावातील स्वच्छतेबाबात मत बदलते. उघड्यावर शौचास गेल्यास त्यामुळे अनेक आजार जडू शकतात. वैयक्तिक स्वच्छता पाळल्यास आपल्याबरोबरच इतरांचे देखील आरोग्य अबाधित राखता येवू शकते. स्वत:बरोबरच गावाच्या आरोग्यासाठी स्वच्छता पाळा, असे कळकळीचे आवाहन करीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती मदन पटले यांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
‘मिशन स्वच्छ भारत’ अंतर्गत पिंडकेपार येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानिमित्त ते मार्गदर्शन करीत होते. सुर्योदयापूर्वीच सकाळी सहा वाजेच्या सुमारास गावातील युवकांनी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण गाव स्वच्छ करण्यास सुरूवात केली. बहुधा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच तिरोडा तालुक्यातील पिंडकेपार येथून जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदन पटले यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. गावाच्या वेशीपासून सुरुवात करून संपूर्ण गावात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रस्त्याच्या कडेला असलेले तृण काढूून केरकचरा खड्यात पुरण्यात आले. नाल्यांची सफाई, गावात झाडू करून रस्ते स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य चौकात हात धुवा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पटले यांनी गावातील लहान मुले, महिला व युवकांना हात धुण्याच्या तांत्रिक पध्दतीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, सर्व आजाराचे मूळ पोट आहे. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुतले नाही तर हातातील घाण पोटात जाते. त्यामुळे अतिसार, हगवण, विषमज्वर, कॉलरा असे विविध प्रकारचे आजार होवू शकतात. लहान मुलांना जेवनापूर्वी हात धुण्याची सवय नसते. त्यांचे पालक सुध्दा याकडे कानाडोळा करतात. परिणामी लहान मुले नेहमीच पोट दुखीने ग्रस्त राहतात. आजची मुले उद्याचे उज्वल भवितव्य आहेत. त्यांचे आरोग्य अबाधित ठेवणे, हे प्रत्येक पालकाचे आद्य कर्तव्य आहे. बालकांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करावी लागेल. त्यासाठी स्वयंपाकापूर्वी, जेवणापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी, शौचाहून आल्यानंतर तसेच बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा, घरी शौचालय बांधा व त्याचा नियमित वापर करा, असे आवाहन देखील त्यांनी याप्रस्ांगंी केले.
दरम्यान गावकऱ्यांनी हात धुण्याची तांत्रिक पध्दत शिकून घेतली. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागारांसह गावकऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)