पावसाच्या आगमनानंतर सुरू आहे नाल्यांची सफाई
By Admin | Updated: June 15, 2014 23:35 IST2014-06-15T23:35:47+5:302014-06-15T23:35:47+5:30
मागील दोन दिवसांपासून पाऊस शहराला झोडपत असून पावसाळा सुरू झाला आहे. अशात मात्र नगर परिषदेला पावसाच्या आगमना नंतर शहरातील नाल्यांची सफाई करण्याचा शहाणपणा सुचला आहे.

पावसाच्या आगमनानंतर सुरू आहे नाल्यांची सफाई
गोंदिया : मागील दोन दिवसांपासून पाऊस शहराला झोडपत असून पावसाळा सुरू झाला आहे. अशात मात्र नगर परिषदेला पावसाच्या आगमना नंतर शहरातील नाल्यांची सफाई करण्याचा शहाणपणा सुचला आहे. शुक्रवारी आंबेडकर चौक ते नेहरू चौक दरम्यान नाल्यांची सफाई करण्यात आली असून अन्य भागात नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. यावरून नगर परिषदेचे मान्सून पूर्व नव्हे तर मान्सूनपश्चात नाली सफाई सुरू असल्याचे चित्र शहरात बघावयास मिळत आहे.
शहरातील खोल भागात असलेल्या कित्येक घरांत पावसाचे पाणी शिरण्याचे चित्र दरवर्षी बघावयास मिळते. अशात पावसाचे पाणी नाल्यांत साचू नये व शहरवासीयांच्या घरात पाणी शिरू नये यासाठी नगर परिषद दरवर्षी मान्सून पूर्व सफाई अभियान राबविते. यंदाही हे अभियान राबविण्यात आले मात्र याची सुरूवात मरारटोली येथील मोठे नाले जेसीबीद्वारे साफ करून करण्यात आली. त्यानंतर पालिकेचे सफाई अभियान मध्यंतरी कोठे लोप पावले होते याची काहीच खबर नव्हती. यावरून फक्त मोठ्या नाल्यांतूनच पाण्याची निकासी होते अशी पालिकेची समज असल्याचे वाटते. कारण पावसाळा तोंडावर आल्यानंतरही शहरातील लहान नाल्यांच्या सफाईकडे पालिकेचे लक्ष दिसून आले नाही.
मात्र शुक्रवारपासून (दि.१३) पालिकेच्या स्वच्छता विभागाला शहरवासीयांची आठवण आली असावी व त्यांनी आंबेडकर चौक ते नेहरू चौक दरम्यान अंडरग्राऊंड नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले. शिवाय शनिवारी श्रीजी लॉंस शेजारच्या नाल्याची जेसीबीद्वारे सफाई केली. तर प्रभागांमध्येही नाल्यांच्या सफाईचे काम सुरू असल्याचे बघावयास मिळाले. आश्चर्याची बाब म्हणजे, सफाईचे हे काम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली असून मागील दोन दिवसांपासून पाऊस शहराला झोडपून काढत आहे.
दुसरीकडे शहरात बघितल्यास नाल्यांची सफाई करून काढण्यात आलेला कचरा व गाळ नाल्यांच्या शेजारी पडून असल्याचे दिसून येत आहे. अशात हा कचरा व गाळ पुन्हा नाल्यांत जाणार व नाल्या पुन्हा तुंबणार. मग त्यातून पाण्याची निकासी कशी होणार व शहरवासीयांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका कसा टळणार हा चिंतनाचा विषय आहे.
यातून पालिकेच्या लेटलतीफ कामकाजाचे मुर्त उदाहरण पुढे येते. वेळीच नाल्यांची सफाई करण्याची गरज होती. मात्र पालिकेने पावसाळा सुरू झाल्यावर नाली सफाईचे काम हाती घेतल्याने शहरवासी सुद्धा यावर आश्चर्य व्यक्त करीत आहेत. यास नगर परिषद सदस्य सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत.
नगर परिषद सदस्यांच्या कार्यप्रणालीमुळे शहरवासी त्रस्त असून आता पावसाळ््यात सुरू करण्यात आलेल्या नाली सफाईच्या अभियानाने अधिकच चिडले आहेत. यातून पालिकेचे मान्सूनपूर्व नव्हे तर मान्सून पश्चात सफाई अभियान सुरू असल्याचे शहरवासी बोलत आहेत. (शहर प्रतिनिधी)