शहरात भीषण पाणीटंचाई
By Admin | Updated: April 30, 2017 00:53 IST2017-04-30T00:53:47+5:302017-04-30T00:53:47+5:30
भरनियमन होत नसून नदीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही मात्र तिरोडावासी ेतहानलेलेच आहेत.

शहरात भीषण पाणीटंचाई
सहकारनगरवासी तहानलेले : महिन्याभरापासून नळाला पाण्याचा थेंब नाही
तिरोडा : भरनियमन होत नसून नदीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही मात्र तिरोडावासी ेतहानलेलेच आहेत. ३३ वर्षे जुनी पाईपलाईन असल्याने पाण्याचा दाब वाढल्यास पाईपलाईन फुटते व ती पुन्हा आपल्यालाच दुरुस्त करावी लागते. या भितीपोटी दाब न वाढविता पाणी देणे सुरू असल्याने शहराच्या कित्येक भागात पाण्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. सहकार नगर सारख्या काही भागात तर नळाला मागील महिन्याभरापासून पाण्याचा थेंबही आलेला नाही.
शहरात कोठेही सार्वजनिक नळ नाही. जेवढे पाणी देण्यात येते त्या पाण्याचे पैसे ग्राहक देतात. आता भारनियमन होत नाही, नदीला पाणीही भरपूर आहे. तरिही महराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून अतिरीक्त काही तास पाणी का सोडले जात नाही हा संशोधनाच विषय आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता विजेचे बिल जास्त येते असे सांगण्यात येत आहे. त्यामानाने पाण्याच्या बिलातून पैसे वसूल होत नसल्याचे सांगण्यात येते. एकही सार्वजनिक नळ नसताना सर्व पाणी मिटरधारकांकडे ग्राहकांकडे जाते व रिडिंगनुसार बिल येते.
दुसरीकडे सहकार नगरात दोन-तीन महिने पाण्याचा थेंबही न घेता मिनिमम चार्जच्या नावावर १५०-१६० रुपये दरमहा घेतले जाते. पाण्याचा थेंब नसताना बिलाचे पैसे का म्हणून भरावेत व याबाबत प्राधिकरणाने सखोल चौकशी करून ज्यांच्याकडे २-३ महिने पाणी देवू शकत नाही त्यांना पाण्याचे बिल पाठवू नये असेही नागरिक बोलत आहेत. अनेक तक्रारी करुन सुद्धा प्रशासन गाढ झोपेत आहे. अधिकारी आपल्या कार्यालयात कुलरच्या हवेत गारवा घेतात. जनप्रतिनिधी मस्त लग्नात खुश असून नवीन पाईपलाईन व नळ योजना येत असल्याचे नागरिकांना गाजर देत आहेत.
सहकार नगरातील बाया, मुली, मुले कमीतकमी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शहीद मिश्रा वॉर्डातील काही ओळखीच्या ठिकाणी जावून पाणी आणतात. अशावेळेस तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील मुख्य चौक ओलांडावा लागतो. येथे वाहने भरधाव वेगाने धावत असतात. पाण्यासाठी जात असताना अपघात झाल्यास संतापाची लाट उसळेल. त्यावेळेस जनआंदोलनास प्रशासनाला सांभाळणे कठिण होईल ऐवढे मात्र खरे.
सहकार नगर, संत कबीर वॉर्ड तसेच इतरही ठिकाणावरुन काही महिलांनी ‘घागर मोर्चा’ काढण्यासाठी कंबर कसली असून लवकरच याबाबत प्रशासनाला माहितीवजा कागदपत्रे व सुचना देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
मागील काही दिवसापासून साई कॉलनी परिसरात दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार शहरवासीयांनी बोलून दाखविली. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीची गरज
पाण्यासाठी हाहाकार माजलेला असताना टुल्लू पंप लावून पाणी खेचण्याचे प्रकार शहरात घडतात. अशात मात्र अन्य नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा होत असताना त्या वेळेत भारनियमन करण्याची गरज आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला आदेश देवून विशिष्ट काळासाठी भारनियमन करुन सर्वांना पिण्याचे पाणी मिळवून देतील एवढीच जनतेची अपेक्षा आहे.