शहर स्वच्छतेचे नियोजन कोलमडले

By Admin | Updated: June 11, 2014 00:09 IST2014-06-11T00:09:13+5:302014-06-11T00:09:13+5:30

पावसाळा आता अगदी तोंडावर आला आहे. मात्र अजूनही शहरातील अनेक भागात नाल्यांची साफसफाई झालेली नाही. ठिकठिकाणी पडलेले सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांवर बड्या असामींनी अतिक्रमण करुन ठेवले आहे

The city cleanliness plans collapsed | शहर स्वच्छतेचे नियोजन कोलमडले

शहर स्वच्छतेचे नियोजन कोलमडले

गोंदिया : पावसाळा आता अगदी तोंडावर आला आहे. मात्र अजूनही शहरातील अनेक भागात नाल्यांची साफसफाई झालेली नाही. ठिकठिकाणी पडलेले सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांवर बड्या असामींनी अतिक्रमण करुन ठेवले आहे. शहरातील पाणी बाहेर नेणारे नालेदेखील कचऱ्यामुळे तुंबले आहेत. अनेक ठिकाणी कचरा साचलेला आहे. पण पालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात अद्याप गांभिर्याने पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येते.
गोंदिया नगर परिषद आपल्या कार्यपद्धतीने नेहमीच प्रकाशझोतात असते. शहरातील नाल्यांवर झालेले अतिक्रमण असो, आरक्षित जमिनी विक्रीचा प्रश्न, नियोजन न करताच करण्यात आलेली लाखोंची कामे किंवा रस्त्यांची झालेली दैनावस्था. प्रत्येकच बाबतीत येथील पालिका जनतेच्या हिताची नसल्याची बाब कित्येकदा पालिकेतीलच काही नगरसेवक आणि नागरिकांनी बोलून दाखविली आहे. पावसाळा सुरू होण्याकरिता काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नगर परिषदेच्या वतीने अद्यापही शहरातील गटारे व नाल्यांची पूर्णपणे साफसफाई केलेली नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना पुन्हा विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
पालिका प्रशासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची बाब तर दूरच, साधे खंडन करण्याचे सौजन्यदेखील दाखवीत नाही. पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या संबंधाने जिल्हाधिकारी कार्यालयात देखील आपत्तीजनक स्थितीत प्रशासन काय करेल? यासंदर्भात आढावा घेण्यात आला. मात्र यानंतरदेखील नगर परिषदेने मान्सूनपूर्व कामाचे नियोजन केवळ कागदावरच केले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात शहराच्या काही भागात नाल्या व गटारातील पाणी रस्त्यांवरुन वाहत असल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होते. शहरातील सांडपाणी वाहून जाण्याकरिता नाल्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र त्या नाल्यांवर बड्या असामींनी बांधकाम केले आहे. त्यामुळे त्या नाल्यांची स्वच्छता होत नाही. नाल्यांमध्ये कचरा साचला असल्यामुळे सांडपाणी मुख्य नालीपर्यंत पोहोचत नाही. नाल्या कचऱ्याने तुंबल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून राहते. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होते.
रिंगरोडच्या पलीकडे नव्याने तयार झालेल्या कॉलनीतील घरांच्या बांधकामाकडे ‘टाऊन प्लॅनिंग’ विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे येथील नागरिकांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसतो. त्याचबरोबर शहरातील पावसाचे आणि सांडपाणी बाहेर जाणाऱ्या मोठ्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यासह उरलेले नाले कचऱ्याने तुंबले असल्यामुळे त्यातील पाणी वाहून जाऊ शकत नाही. परिणामी शहरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा प्रकार दरवर्षी अनुभवास येतो. पालिका प्रशासनाला नागरिक ठरलेल्या कराची रक्कम दरवर्षी भरत असतानादेखील नागरिकांच्याच आरोग्य आणि सोयी-सुविधांकडे पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर पसरला आहे.
नगर परिषदेच्या वतीने दरवर्षीच ऐन पावसाळ्यात नाल्यांच्या सफाईच्या कामाला सुरूवात केली जाते. त्यामुळे रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. ही समस्या आता शहराकरिता दरवर्षीची झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The city cleanliness plans collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.