नागरिकांनी न घाबरता पुढे यावे

By Admin | Updated: December 6, 2014 22:50 IST2014-12-06T22:50:29+5:302014-12-06T22:50:29+5:30

समोरच्या व्यक्तीला पैसे देऊन आले काम करवून घेण्याची एक परंपराच झाली आहे. कायद्याच्या भाषेत मात्र हा व्यवहार भ्रष्टाचार समजला जातो. समाजात एका रोगाप्रमाणे फोफावत असलेल्या या भ्रष्टाचाररूपी

Citizens should come forward without fear | नागरिकांनी न घाबरता पुढे यावे

नागरिकांनी न घाबरता पुढे यावे

दिनकर ठोसरे : सतर्कतेमुळेच कारवायांत वाढ
गोंदिया : समोरच्या व्यक्तीला पैसे देऊन आले काम करवून घेण्याची एक परंपराच झाली आहे. कायद्याच्या भाषेत मात्र हा व्यवहार भ्रष्टाचार समजला जातो. समाजात एका रोगाप्रमाणे फोफावत असलेल्या या भ्रष्टाचाररूपी रोगावर आळा घालण्याची जबाबदारी शासनाने आमच्यावर टाकली आहे. मात्र यात नागरिकांच्या सहकार्याशिवाय काहीच करू शकत नाही. नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन भ्रष्टाचाराच्या या रोगाचा नायनाट करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे यांनी केले. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
जिल्ह्यात सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया दिवसागणिक वाढत आहेत. मागील चार वर्षांत जे घडले नाही ते या वर्षात विभागाकडून केले जात आहे. याला विभागाच्या कारवाया म्हणाव्या की नागरिकांचा पुढाकार हे जाणून घेण्यासाठी विभागाकडून करण्यात येणारे प्रयत्न हे जाणून घेण्यासाठी लोकमतने ठोसरे यांच्याशी केलेली बातचीत त्यांच्यात शब्दांत...
जिल्ह्यात आतापर्यंत एसीबीच्या कारवाया किती झाल्या?
-सन २००९ पासून जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय सुरू झाले आहे. तेव्हापासून या विभागाने आतापर्यंत ३८ कारवाया केल्या आहेत. यात सन २०१० मध्ये एक, २०११ मध्ये पाच, २०१२ मध्ये तीन, २०१३ मध्ये चार व २०१४ मध्ये आतापर्यंत २५ कारवाया झाल्या आहेत. मागील चार वर्षांत केलेल्या कारवायांत सर्वाधिक कारवाया महसूल विभागातील आहेत. या वर्षातही करण्यात आलेल्या कारवायात सर्वाधिक पाच कारवाया महसूल विभागाच्याच आहेत.
कारवायांचे प्रमाण अचानक वाढण्यामागचे कारण काय?
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात सुरू केलेला १०६४ टोल फ्री क्रमांक हे यामागील कारण असू शकते. शिवाय एसीबीकडून लोकांना त्यांचे काम करून देण्याची हमी दिली जाते. कारवाईनंतरही सतत तक्रारदाराच्या आम्ही संपर्कात राहतो व त्यांचे मनोधैर्य खचणार याची काळजी घेतो. त्यामुळे नागरिकांच्या मनातील भिती कमी होत असून ते पुढे येत आहेत. विभागही सतत त्यांच्या पाढीशी उभा राहणार आहे.
लोकांच्या तक्रारी वाढविण्यासाठी विभागाकडून कोणते प्रयत्न केले जातात?
- यासाठी जास्तीत जास्त जनसंपर्क वाढविला जात आहे. तसेच सर्वच कार्यालयांत विभागाच्या टोल फ्री क्रमांकाच्या माहितीसाठी फ्लेक्स लावले आहेत. पेट्रोल पंप, बसस्थानकांसारख्या गर्दीच्या व सार्वजनिक स्थळांवर स्टीकर्स लावण्यात आले आहेत. जवळील ग्राम कामठा येथील ग्राम पंचायत कार्यालयात बैठक घेतली. सध्या सुरू असलेल्या लहरीबाबांच्या उत्सवातही जनतेच्या माहितीस्तव फ्लेक्स लावण्यात आले आहेत. याचप्रकारे सार्वजनिक उत्सवांत फ्लेक्स लावले जातात. त्यामुळे लोकांना याबद्दलची माहिती मिळते. आता प्रत्येकाकडे मोबाईल आल्यामुळे लोक लगेच त्या नंबरवर संपर्क करतात.
आतापर्यंत किती रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे?
- एसीबीने आतापर्यंत एकूण ३८ कारवाया केल्या आहेत. यामध्ये सुमारे दीड कोटींची मालमत्ता विभागाने जप्त केली आहे.
प्रकरणे निकाली निघण्याचे आणि न्यायप्रविष्ठ असण्याचे प्रमाण किती आहे?
- विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवायांतील २३ प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ठ आहेत, तर तीन प्रकरणे निकाली लागली असून दोन प्रकरणे उच्च न्यायालयात सुरू आहेत. उर्वरीत प्रकरणांवर कारवाई सुरू आहे.
तक्रार करण्यासाठीची प्रक्रिया काय? केवळ टोल फ्री क्रमांकावरूनही तक्रार नोंदविता येते का?
- तक्रार नोंदविण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया तर पार पाडावी लागतेच. यासाठी तक्रारदाराला कार्यालयात यावे लागते. तक्रारदार कार्यालयात आल्यावर त्यांची लेखी तक्रार व आवश्यक ती कागदोपत्री कारवाई केली जाते. शिवाय एखादी व्यक्ती कार्यालयात येण्यास असक्षम असल्यास किंवा दुर्गम भागातील असल्यास अशा परिस्थितीत विभागाकडून त्यांना जमेल ते सहकार्य केले जाते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Citizens should come forward without fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.