नागरिकांचे ‘जीवन’ धोक्यात
By Admin | Updated: June 21, 2016 01:42 IST2016-06-21T01:42:29+5:302016-06-21T01:42:29+5:30
पाणी म्हणजे जीवन, पाणी नसेल तर माणूस जगू शकत नाही. पण नळातून आपल्या घरात येणारे हे जलरुपी ‘जीवन’

नागरिकांचे ‘जीवन’ धोक्यात
गोंदिया : पाणी म्हणजे जीवन, पाणी नसेल तर माणूस जगू शकत नाही. पण नळातून आपल्या घरात येणारे हे जलरुपी ‘जीवन’ किती सुरक्षित आहे याचा अंदाज कोणालाच नसतो. जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या बेफिकीरपणामुळे एखाद्या वेळी तमाम नागरिकांचे जीवन किती धोक्यात येऊ शकते याचा प्रत्यय सोमवारी ‘लोकमत’ चमुने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये आला.
या स्टिंगमध्ये गोंदिया शहरासह जिल्ह्यातील काही पाणी टाक्यांवर चढून लोकमत प्रतिनिधींनी तेथील धोकादायक स्थितीचे अवलोकन केले. अशाच पद्धतीने कोणीही माथेफिरू त्या टाक्यांवर चढला आणि त्याने पाण्यात काही मिसळण्याचा प्रयत्न केल्यास त्याला रोखणार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सोमवारी लोकमत चमुने एकाचवेळी जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या पाण्याच्या टाक्यांची पाहणी केली. गोंदिया शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १९७८ मध्ये सुरू झालेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी जीवन प्राधीकरणच्या आवारातच १८ लाख लिटर क्षमतेची टाकी बनविण्यात आली होती. आज या टाकीच्या पायऱ्यांची पॅराफिट वॉल जीर्ण झाली असून त्याला भेगा पडल्या आहेत. लोकमत चमुने त्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न केला असता तेथील सुरक्षा रक्षकाने टाकीवर चढण्यास मनाई केली. पायऱ्या जीर्ण असल्यामुळे त्यावर कोणी चढत नाही, असेही त्याने सांगितले. अधिक माहिती घेतली असता संबंधित चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने वर्षातून एक-दोन वेळा टाकी साफ करण्यासाठी वर चढत असल्याचे सांगितले. त्यामुळे ही टाकी किती स्वच्छ असेल याचा अंदाज लावता येतो.
गोंदिया शहरात दोन वर्षापूर्वी सिव्हील लाईन, भीगनगर आणि रामनगर या भागात नव्याने तीन टाक्या बनविण्यात आल्या आहेत. त्यातील सिव्हील लाईनमधील टाकी २१ लाख ३५ हजार लिटर क्षमतेची असून २१ मीटर उंच आहे. दुपारी या टाकीच्या खाली असलेल्या कंपाऊंड वॉलला कुलूप असल्यामुळे फाटकावरून उड्या मारून आत प्रवेश करण्यात आला. जीवन प्राधीकरणचा कोणीही सुरक्षा कर्मचारी तिथे नव्हता. किमान आजुबाजूला राहणारे लोक तरी जागरूक असतील आणि लोकमत प्रतिनिधींना प्रश्न करतील, असे वाटले. परंतू कोणालाही काही सोयरसूतक नव्हते. त्यामुळे लोकमत चमुने थेट पायऱ्यांद्वारे त्या भव्य टाकीवर जाऊन पाहीले तर वर तीनही भगदाड सताड उघडी होती. त्यातून खाली टाकीत उतरण्यासाठी लोखंडी शिडी लागली होती. विशेष म्हणजे खाली उतरण्यासाठी असलेल्या जागेवर झाकण्यासाठी कोणतेही सिमेंट किंवा लोखंडी झाकण आजुबाजुला सुद्धा पडलेले नव्हते.
गोंदिया तालुक्यातील खातिया या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीचीही हीच अवस्था होती. या टाकीलाही वरून कोणतेही झाकण नव्हते. त्यामुळे कोणीही व्यक्ती सरळ टाकीवर चढून त्या पाण्यापर्यंत पोहोचू शकत होती. या टाकीची देखभाल ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व ग्रामपंचायतकडे असल्याचे समजते.
आमगाव येथील बनगाव पाणी पुरवठा योजना या ४८ गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या अनेक ठिकाणी टाक्या आहेत. परंतु बहुतांश सर्व टाक्यांची भगदाडं सताड उघडी आहेत. लोकमत चमुने बनगाव येथील टाकीवर चढून शहानिशा केली असता तिथे झाकण तर नव्हतेच, शिवाय आजुबाजूला स्वच्छताही नव्हती. त्यामुळे नागरिकांना मिळणारे पाणी किती शुद्ध असते याची कल्पना आली.
स्टिंगचा उद्देश जागरूकता
४गडचिरोली जिल्ह्यात एका पाण्याच्या टाकीत विषारी द्रव मिसळण्याची एक घटना घडली. सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे अनेक लोकांच्या जीवितास धोका होण्यापासून वाचविता आले. पण असाच प्रकार कुठेही होऊ शकतो. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या किती सुरक्षित आहेत याची तपासणी करण्यासाठी लोकमत चमुने यासंबंधीचे स्टिंग केले. यात संबंधित यंत्रणेला जागरूक करून यापुढे त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या उणिवा दूर कराव्यात हाच या स्टिंगचा उद्देश होता.