वातावरणातील बदल ठरताहेत घातक
By Admin | Updated: May 31, 2015 00:52 IST2015-05-31T00:52:26+5:302015-05-31T00:52:26+5:30
वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे.

वातावरणातील बदल ठरताहेत घातक
कधी आभाळ तर कधी उन्हाचा तडाखा : ताप, सर्दी, खोकल्याचे आजार वाढले, आबालवृध्द हैराण
भंडारा : वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालय, दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या जीवसृष्टीला वातावरणानुसार जगण्याची सवय पडलेली आहे. त्यात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वातावरणाशी समरस होण्यास काही दिवसांचा अवधी लागतो. दरम्यान व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. मात्र ज्यांची प्रतिकारशक्ती प्रबळ आहे, त्यांना अशा आजारांवर मात करणे शक्य होते. परंतु सर्वाना ते शक्य नसल्यामुळे काहींना आजाराचा सामना करावा लागतो. या वर्षात ऊन तापायला सुरूवात झाली. वातावरणात अचानक बदल घडत गेले. त्यामुळे कधी प्रखर ऊन तर कधी ढगाळ वातावरण असाच यावर्षीच्या उन्हाळ्याचा अनुभव येत आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून ग्रामीण भागासह शहरात देखील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.
वातावरणातील अचानकपणे होत असलेल्या बदलामुळे दैनंदिन सवयीत बदल होत असल्यामुळे शरीराच्या व्यवस्थापनात बदल होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घशाचा आजार उद्भवतात. तसेच लहान मुलांना वातावरणाशी समरस होण्याची सवय नसते. त्यांना वेगवेगळ्या ऋतुचा अनुभव नसतो. त्यामुळे अचानक झालेल्या बदलामुळे मुले आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. कधी दिवसभर ढगाळ वातावरण तर कधी सकाळपासून कडक उन्हाचे चटके यामुळे थंड वातावरणातून अचानक तीव्र तापमानाशी समरस होणे अशक्य असते. त्यामुळे आजाराचा सामना करावा लागतो.
उन्हाळ्यात अधिक तापमान राहत असताना थंड पाणी, सरबत, ज्युश पिण्यात येतात. कुलर, एसीमध्ये राहून शरीराला आवश्यक ते वातावरण निर्माण केले जातात. पण अचानक पाऊस आल्यास वातावरणात गारवा निर्माण होतो. त्यामुळे शरीराला झालेली सवय एकदम बदलणे शक्य नसते. परिणामी आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. (नगर प्रतिनिधी)
मानवी शरीरात मिठाचे प्रमाण असते. ते वातावरणानुसार कमी-अधिक होतात. ऋतू बदलामुळे शरीराचे संतुलन बिघडते. त्यात ज्यांची प्रतिकारशक्ती सशक्त आहे तो या वातावरणाशी समरस होतो. मात्र ज्याला ते शक्य नसते असे लोक आजारी पडतात. त्यात मुले अधिक प्रमाणात आजारी पडतात.
- डॉ.देवेंद्र धांडे, लाखनी.
या दिवसामध्ये लहान मुलांना संसर्गजन्य आजार बळावतात. ताप व डायरिया सारखे आजार वाढतात. लहान मुलांना या दिवसांमध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, उलट्या, हगवण यासारखे आजार बळावतात. त्यामुळे डासांपासून बचाव करणे व दूषित पाण्यापासून सावध राहण्याची गरज आहे.
- डॉ.यशवंत लांजेवार,भंडारा.
वातावरणात बदल झाल्याने ताप आजारांचे रुग्ण वाढले आहे. अकाली पावसामुळे तापमान कमी झाले. मात्र पुन्हा कडाक्याचे ऊन तापायला सुरूवात झाल्याने शरीर संतुलन बिघडून आजाराला तोंड द्यावे लागत आहे. अशा पावसात भिजल्यास सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. तसेच उन्हात अधिक वेळ फिरल्यास शरीराला थकवा जाणवतो.
- डॉ. देवेद्र पातुरकर,भंडारा.
उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटतात. त्यामुळे दूषित पाण्याचे प्रमाण वाढू शकते. जमिनीतील पाणी काही प्रमाणात दूषित होते. या पाण्यामुळे डायरियासारखे आजारांचे प्रमाण वाढते. वषार्तील तीनही ऋतूंत वेगवेगळ्या वातावरणाशी सजीव समरस होतो. सवयीनुसार ते शक्य होते. मात्र अचानक बदलाचा विपरीत परिणाम होऊन आरोग्य धोक्यात येते.
- डॉ. डॉ. विजय ठक्कर,पवनी.
काळजी घ्यावी
उन्हात अधिक काळ बाहेर फिरणे टाळावे, पाणी स्वच्छ असण्याची काळजी घ्या, पाणी उकळून थंड करुन प्यावे, हात वारंवार धुवा, डासांपासून बचाव करा, स्वच्छता पाळा, सर्दी व खोकल्याच्या रुग्णांनी रुमाल बांधावा. उन्हातून आल्याबरोबर थंड पदार्थ सेवन करू नका. बाहेरून आल्यावर अचानक कूलर, एसीची हवा घेण्याचे टाळावे. बर्फ गोळा खाण्यापूर्वी त्याची शहानिशा करा. त्यावर टाकण्यात येणारे पदार्थयुक्त कलर कसे बनतात, त्यात साकरीनचे प्रमाण किती असतात याची माहिती घ्या. पण शक्यतोवर असे पदार्थ खाण्याचे टाळणेच योग्य राहील.
वातावरणातील बदलामुळे रोगाची लक्षणे
उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानाशी समरस होण्यासाठी कूलर, एसी आदी कृत्रिम वातावरण निर्मिती केली जाते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे तापमानात घट होते व शरीराला कूलरची सवय लागल्याने आतील बदलामुळे प्रकृतीवर परिणाम जाणवतो. त्यामुळे वातावरण थंड असल्यास कूलरचा वापर थांबवा. तसेच तापमान वाढल्यास एसी, कूलरची हवा घेत असताना तत्काळ बाहेर पडू नये.