कोमेजल्या २८१ कळ्या
By Admin | Updated: February 4, 2016 01:46 IST2016-02-04T01:46:11+5:302016-02-04T01:46:11+5:30
जिल्ह्यात एकीकडे रुग्णालयांमधील प्रसूतीचे प्रमाण ९९.७१ वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी करण्यात यश आलेले नाही.

कोमेजल्या २८१ कळ्या
नरेश रहिले गोंदिया
जिल्ह्यात एकीकडे रुग्णालयांमधील प्रसूतीचे प्रमाण ९९.७१ वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी करण्यात यश आलेले नाही. कुपोषणाबरोबरच इतर कारणांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात गेल्या नऊ महिन्यात २८१ बालकांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०१५ च्या एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात १३ हजार ६६६ महिलांची प्रसूती झाली. यातील १३ हजार ६२६ महिलांची म्हणजेच ९९.७१ टक्के प्रसूती आरोग्य संस्थेतच करण्यात आली, तर फक्त ४० महिलांची प्रसुती घरी झाली आहे.
एकूण प्रसूतींपैकी ३ हजार ९२७ उपकेंद्रात, २ हजार २६२ प्राथमिक आरोग्य केंद्रात तर ६ हजार ६६२ प्रसूती बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आल्या आहेत. ७७५ प्रसुती खासगी रूग्णालयात करण्यात आल्या.
जिल्ह्यातील महिलांची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने महिलांना आरोग्य संस्थेतच प्रसूती करावी असा आग्रह धरला. त्याचा परिणाम आज गोंदियासारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील महिला प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होतात.
महिलांची आरोग्य संस्थेतच सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने आग्रह धरला होता. यासाठी जनजागृतीही करण्यात आली. त्यामुळे महिलांची घरी प्रसुती होण्याचे प्रमाण एक टक्काही नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र आरोग्य संस्थेत दाखल होऊनही बालमृत्यू थांबविण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे.
२.२३ टक्के नवजात बालकांचा मृत्यू
मागील नऊ महिन्यात ३०५ म्हणजेच २.२३ टक्के अर्भक दगावले आहेत. यात २४६ महिलांनी जुळ्या बालकांना जन्म दिला. डिसेंबर महिन्यात १ हजार ६६९ प्रसूती झाल्या. यातील १ हजार ६६६ प्रसूती आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आल्या. यात उपकेंद्र ४९०, प्राथमिक आरोग्य केंद्र २६७, बाई गंगाबाई महिला रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात ७५७ व खासगी रूग्णालयात १५७ खासगी रूग्णालयात प्रसूती करण्यात आली. ३ महिलांची प्रसूती घरी झाली. या महिन्यात ४१ नवजात बाळांचा जन्म झाला तर ११ जुळ््या बालकांनी जन्म घेतला.
आठवडाभरात ३३.८० टक्के बालकांचा मृत्यू
जिल्ह्यात ९ महिन्यात २८१ बालकांचा मृत्यू झाला. यात १ ते ७ दिवसाच्या आत ९५ बालकांचा मृत्यू झाला आहे. १ ते ६ वर्षातील ३६ बालकांचा तर ६४ बालकांचा जन्म घेतल्यानंतर २४ तासाच्या आत मृत्यू झाला. ७ ते २८ दिवसात ४१, एक महिना ते १ वर्षातील ४५ बालकांचा मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यात एक वर्षाच्या आत २७ बालकांचा मृत्यू झाला.
रस्त्यातच तीन गर्भवतींचा मृत्यू
आरोग्य विभागाने गर्भवतींना आरोग्य संस्थेत पाहेचविण्यासाठी जननी शिशु सुरक्षा योजना अंमलात आणली असली तरी गर्भवतींना योग्य वेळी आरोग्य संस्थेत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाची ही सेवा निष्फळ ठरत आहे. परिणामी नऊ महिन्यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. नऊ महिन्यात सहा मातांचा मृत्यू झाला आहे. या मृत गर्भवतींमध्ये ग्रामीण भागातील पाच तर शहरातील एका गर्भवतीचा समावेश आहे. एप्रिल, मे, जून व आॅगस्ट महिन्यात प्रत्येकी तर आॅक्टोबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. दोन मातामृत्यू बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात तर एक मातामृत्यू खासगी रूग्णालयात आहे.