मिनी मंत्रालयात पदाधिकाऱ्यांच्या हातात झाडू
By Admin | Updated: October 3, 2015 01:32 IST2015-10-03T01:32:10+5:302015-10-03T01:32:10+5:30
जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशनद्वारे २५ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ..

मिनी मंत्रालयात पदाधिकाऱ्यांच्या हातात झाडू
जि.प.त स्वच्छता मोहीम : श्रमदानातून केली कार्यालय व परिसराची स्वच्छता
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशनद्वारे २५ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानात शुक्रवारी अनोखा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या चार मजली इमारतीसह विस्तीर्ण आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात स्वत: पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी हातात झाडू पकडून परिसराची स्वच्छता केली.
या स्वच्छता मोहीमेत जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, सभापती पी.जी.कटरे, विमल नागपुरे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल. पुराम, पाणी व स्वच्छता विभागाचे राजेश देशमुख तसेच जिल्हा कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, कार्यकारी अभियंता (ल.पा.) यांच्यासह सर्व विभागप्रमुख सहभागी झाले.
सुरुवातीला महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री व जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून अध्यक्ष उषाताई यांनी उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर सर्वांनी जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ केला.
तसेच सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयाची अंतर्गत साफसफाई केली.
या स्वच्छता अभियानाची प्रेरणा घेऊन महिन्यातून एकदा अशी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे उषाताई मेंढे यांनी यावेळी सांगितले. उपाध्यक्ष गहाने यांनी अशी मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येईल, तसेच जि.प. परिसरात असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून कार्यालयाची नियमित स्वच्छता करण्यात यावी, असे सूचविले.
सदर स्वच्छता मोहिमेकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक गौतम, कार्यक्रम व्यवस्थापक येरपुडे यांच्यासह दिशा मेश्राम, रहमतकर, राजेश उखळकर, अतुल गजभिये, देवानंद बोपचे, मुकेश त्रिपाठी, भागचंद रहांगडाले, पदलमवार, बाळकृष्ण पटले, तृप्ती साकुरे, विशाल मेश्राम, शोभा फटिंग, छाया सहारे, सचिन रोडी, रमेश उदयपुरे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
(जिल्हा प्रतिनिधी)
मोहिमेत सातत्य राहील का?
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे हा परिसर निश्चितच स्वच्छ आणि सुंदर झाला आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या इमारतींचे अनेक कोपरे खर्ऱ्याच्या पिचकाऱ्यांनी सतत रंगलेले दिसतात. स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी पसरलेली असते. हे चित्र बदलण्यासाठी अशा पद्धतीची मोहीम सातत्याने राबविणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे स्वच्छता राखण्याविषयी सर्वांना शपथही देण्यात आली. मात्र ही शपथ कर्मचारी गांभिर्याने घेतील का, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. मात्र मोहिमेत सातत्य ठेवल्यास सर्वांना शिस्त लागण्यास निश्चितच मदत होणार आहे. हे सातत्य राहील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.