अपेक्षांचे ओझे पेलावे लागणार

By Admin | Updated: December 8, 2014 22:37 IST2014-12-08T22:37:16+5:302014-12-08T22:37:16+5:30

नाही-हो करता करता आणि सर्व कटुता बाजुला सारत अखेर राज्यात सत्तेच्या सारीपाटावर भाजप-सेना युतीचे सरकार पुन्हा एकदा विराजमान झाले. सलग दुसऱ्यांदा आमदारकी पटकावणाऱ्या राजकुमार बडोले

The burden of expectations will have to be met | अपेक्षांचे ओझे पेलावे लागणार

अपेक्षांचे ओझे पेलावे लागणार

मनोज ताजने - गोंदिया
नाही-हो करता करता आणि सर्व कटुता बाजुला सारत अखेर राज्यात सत्तेच्या सारीपाटावर भाजप-सेना युतीचे सरकार पुन्हा एकदा विराजमान झाले. सलग दुसऱ्यांदा आमदारकी पटकावणाऱ्या राजकुमार बडोले यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी आसुसलेल्या गोंदियाला त्यांच्या रूपाने लाल दिवा मिळाला. आता या लाल दिव्याच्या झगमगाटात संपूर्ण जिल्हा न्हाऊन निघणार असला तरी जिल्हावासियांच्या अपेक्षांचे ओझेही ना.बडोले यांना पेलावे लागणार आहे.
वास्तविक अवघ्या साडेपाच वर्षात एक शाखा अभियंता ते कॅबिनेट मंत्री हा बडोले यांचा प्रवास अनेकांचे डोळे दीपवणारा आहे. पक्षीय विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत विरोधकांचाच त्यांना आतापर्यंत जास्त त्रास झाला. पण आपला नम्र स्वभाव आणि अभ्यासू वृत्ती यामुळे त्यांनी लोकांसोबत पक्षश्रेष्ठींचेही मन जिंकले. विधानसभेत गेल्या पाच वर्षात कित्येक प्रश्नांचा पाठपुरावा करून त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीचा परिचय दिला. यावेळच्या निवडणुकीत विजयी झालेले गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील भाजपच्या नवख्या आमदारांमध्ये केवळ बडोले हे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. त्यामुळे प्रादेशिक समतोल, गेल्या पाच वर्षातील त्यांच्या कामाचे भाजपच्या वरिष्ठांनी केलेले मूल्यमापन, आणि मागास समाजाला प्रतिनिधीत्व या निकषांवर बडोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले ही गोंदिया जिल्ह्यासाठी निश्चितच समाधानाची बाब आहे.
खासदार नाना पटोले पटोले यांना आता आमदारकी सोडून खासदारकीची निवडणूक लढण्याचा निश्चितच पश्चाताप होत असणार. १५ दिवसांपूर्वीच त्यांनी गोंदियात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना आपण कोणता ‘त्याग’ केला हे आपल्यालाच माहीत, अशा शब्दात आपली व्यथा बोलून दाखविली होती. गेल्या २०-२५ वर्षांपासून राजकारणात असलेल्या पटोले यांना जे मिळाले नाही ते बडोले यांना अवघ्या साडेपाच वर्षात मिळाले. या सर्व नशिबाच्या गोष्टी आहेत. पण आता या संधीचे बडोले यांनी सोने करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात धान उत्पादकांना कठीण परिस्थितीतून वाटचाल करावी लागत आहे. तलावांचा जिल्हा अशी ओळख असतानाही गावोगावच्या मामा तलावांचे पाणी शेतीला मिळत नाही. त्यांची दुरूस्ती, गाव काढण्यासाठी निधीची गरज आहे. पर्यटन विकासातून रोजगार निर्मितीला भरपूर वाव आहे. वनौपजावर आधारित छोट्या उद्योगांची उभारणी होऊ शकते. आदिवासीबहुल भागासह मागासवर्गीयांच्या अनेक योजनाही पुरेशा निधीअभावी रखडल्या आहेत, आता सामाजिक न्याय खाते मिळाले असल्यामुळे जिल्ह्याला न्याय देण्यासाठी ना.बडोले निश्चितच पुढाकार घेतील असाही जिल्हावासीयांचा विश्वास आहे. हा विश्वास त्यांनी कायम ठेवावा एवढीच अपेक्षा आहे.

Web Title: The burden of expectations will have to be met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.