भारनियमनाविरूद्ध भाजपचे आंदोलन
By Admin | Updated: May 30, 2014 23:58 IST2014-05-30T23:58:37+5:302014-05-30T23:58:37+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहर व ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून सुडबुद्धीने घोषित-अघोषित भारनियमन केले जात असल्याचा आरोप करीत हे भारनियमन बंद

भारनियमनाविरूद्ध भाजपचे आंदोलन
अधिकार्यांचा घेराव : भारनियमन न करण्याचे अधिकार्यांचे आश्वासन
गोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहर व ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून सुडबुद्धीने घोषित-अघोषित भारनियमन केले जात असल्याचा आरोप करीत हे भारनियमन बंद करण्याच्या मागणीला घेवून भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात रामनगर येथील महाविरतण कार्यालयावर धडक देऊन अधिकार्यांना घेराव करण्यात आला.
भाजप कार्यालयातून सकाळी ११.३0 वाजता शेकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून घोषणाबाजी करीत महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी आंदोलनाची पूर्वसूचना देवूनही अधीक्षक अभियंता व कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजपच्या पदाधिकार्यांनी कार्यालयात उपस्थित अधिकार्यांना याचा जाब विचारला. तसेच जोपर्यंत जबाबदार अधिकारी येत नाही व भारनियमन बंद करण्याचे निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. तसेच विद्युत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही दिला.
यावर कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी पदाधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी भाजपने शहर व ग्रामीण भागातील जनतेला भारनियमनामुळे होणार्या त्रासाची माहिती दिली. तसेच त्यामुळे उन्हाळ्यात होणार्या पाणी पुरवठय़ाच्या समस्येची माहिती सांगितली. तक्रार करताना फोनवर उद्धटपणे बोलणार्या कर्मचार्यांवर कारवाई करावी. शेतकर्यांच्या कापलेल्या कृषी पंपांची जोडणी त्वरीत करावी, कृषी पंपांच्या जोडण्या त्वरीत शेतकर्यांना द्यावे. तसेच वीज चोरीसाठी सामान्य लोकांना दंड दिले जाते तर माहिती असूनही वीज चोरी प्रकरणात लोकप्रतिनिधींना का सोडले जाते, याचा जाब उग्र झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचारला. या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून संबंधित दोषी अधिकार्यांवर कारवाई करून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली.
यावर अभियंता मेश्राम यांनी शहरात भारनियमन बंद करण्याची मागणी मान्य केली व ग्रामीण भागातील भारनियमन बंद करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर निवेदन पाठवून चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच वीज चोरी प्रकरणात दोषी अधिकार्यांवर व चोरी करणार्यांवरही कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. भारनियमन बंद न झाल्यास उग्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी भाजपने दिला.
दोन तास चाललेल्या या आंदोलनात प्रदेश सदस्य अशोक इंगळे, शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, गटनेता दिनेश दादरीवाल, जिल्हा उपाध्यक्ष गणेश हेमने, महेश आहुजा, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष संजय कुळकर्णी, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजा बन्सोड, अहमद मनियार, अमित झा बिसेन, संजय मुकुटे, छत्रपाल तुरकर, संतोष कावळे, अमृत इंगळे, नगरसेवक कशीश जायस्वाल, घनश्याम पानतवने, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)