भाजपचे नगरसेवक राजस्थानच्या सहलीवर

By Admin | Updated: July 27, 2014 00:10 IST2014-07-27T00:10:12+5:302014-07-27T00:10:12+5:30

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता राजकीय खेळी सुरू झाली आहे. पालिकेतील संख्याबल बघता यावेळी भाजप-सेनेला लॉटरी लागण्याची पूर्ण शक्यता आहे. ही संधी हातून जाऊ नये

BJP corporator's trip to Rajasthan | भाजपचे नगरसेवक राजस्थानच्या सहलीवर

भाजपचे नगरसेवक राजस्थानच्या सहलीवर

गोंदिया : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता राजकीय खेळी सुरू झाली आहे. पालिकेतील संख्याबल बघता यावेळी भाजप-सेनेला लॉटरी लागण्याची पूर्ण शक्यता आहे. ही संधी हातून जाऊ नये व आपले सदस्य फुटून सत्तापक्षाच्या संपर्कात येऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना राजस्थानच्या सहलीवर पाठविण्यात आले आहे.
येत्या ६ आॅगस्ट रोजी नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे हे पद आपल्याकडेच रहावे यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची जोड-तोड सुरू झाली आहे. मात्र पालिकेत सदस्य संख्याबल बघता कॉंग्रेसकडे पाच, राष्ट्रवादीचे ११ व अपक्ष दोन असे एकूण १८ सदस्य आहेत. तर भाजपचे सर्वाधीक १६ व शिवसेनेचे तीन असे एकूण १९ सदस्य आहेत. यामुळे पालिकेत आजघडीला सर्वाधिक सदस्य संख्या भाजप-सेना युतीची असून ही संधी हातून जाऊ देण्यास भाजप-सेना तयार नाही. मात्र फोडा-फोडीच्या राजकारणात काहीही शक्य असल्याचे यापूर्वीही नगर पालिकेत दिसून आले आहे. यामुळेच कुठल्याही प्रकारची ‘रिस्क’ न पत्करता भाजपने आपल्या सदस्यांना आतापासूनच राजस्थान सरकारचे पाहुणे म्हणून पाठविले आहे.
गुरूवारी (दि.२४) भाजपचे १२ सदस्य राजस्थानकडे रवाना झाले आहेत. उर्वरीत चार सदस्य अद्यापही गोंदियातच आहे. त्यातील तीन सदस्य रविवारी (दि.२८) रवाना होणार असल्याची माहिती आहे. काँगे्रसच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊन त्यांचा मतदानाचा अधिकार सुद्धा यामुळे संपुष्टात आला आहे. हीच बाब भाजप-सेना युतीसाठी लकी ठरत आहे. अशात भाजपचे १६ सदस्य असल्याने त्यांच्याकडे अध्यक्षपद व शिवसेनेचे तीन सदस्य असल्याने त्यांना उपाध्यक्षपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासाठी भाजपमधून अनिल पांडे, कशिश जायस्वाल, घनश्याम पानतवने व भावना कदम यांच्या नावांची चर्चा आहे. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडे हर्षपाल रंगारी व लता रहांगडाले यांच्यातून एकाची निवड केली जाईल.
संख्येच्या आधारावर भाजप-सेना युतीकडून हे सर्व समिकरण लावले जात असले तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादी एवढ्या सहजासहजी खुर्ची सोडणार नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. यामुळेच भाजपने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आपल्या नगरसेवकांना राजस्थानला रवाना करून दिले. तिथेच सर्व सदस्य एकत्रित होणार असून निवडणुकीपर्यंत राजस्थानमध्येच राहणार असल्याचीही माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: BJP corporator's trip to Rajasthan