प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ

By Admin | Updated: July 26, 2016 01:37 IST2016-07-26T01:37:43+5:302016-07-26T01:37:43+5:30

‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून महाराजस्व अभियानांतर्गत आॅगस्ट महिन्यात महासमाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

Benefits of schemes to each family | प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ

प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ

पालकमंत्र्यांची अपेक्षा : महाराजस्व अभियानाची पूर्वतयारी सुरू
गोंदिया : ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून महाराजस्व अभियानांतर्गत आॅगस्ट महिन्यात महासमाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध ५० पेक्षा जास्त योजनांचा लाभ ४० हजार लाभार्थ्यांना देण्याचे निश्चित केले आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
रविवारी २४ जुलै रोजी सडक-अर्जुनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत महाराजस्व अभियानांतर्गत पूर्वतयारी समाधान शिबिर घेण्यात आले. या वेळी उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, पं.स. सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी बी.आर. लोकरे यांची उपस्थिती होती. शासनाच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांना देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून बडोले पुढे म्हणाले, यासाठी सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव व गोरेगाव तहसील कार्यालय येथे स्वतंत्र समाधान नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांनी पूर्व समाधान शिबिरानंतर परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह समाधान कक्षात सादर करावे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देणे शक्य होईल. दिव्यांग व्यक्तींनासुध्दा त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रत्येक योजनेचा फायदा प्रत्येक कुटुंबाला मिळाला पाहिजे, यासाठी लाभार्थ्यांनी या शिबिरातील स्टॉल्सवरून विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, पूर्व तयारी समाधान शिबिरात उपस्थित लाभार्थ्यांची संख्या बघून खऱ्या अर्थाने समाधान होत आहे. येथे असलेल्या विविध स्टॉल्सवरु न योजनांचे अर्ज लाभार्थ्यांनी परिपूर्ण भरून समाधान नियंत्रण कक्षात सादर करावे. हक्काने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जावून लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ मिळण्याची मागणी करावी. परिपूर्ण भरलेल्या अर्जामुळे त्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, आजच्या पूर्व तयारी समाधान शिबिराला मिळालेला लाभार्थ्यांचा प्रतिसाद उदंड आहे. पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे. परंतु योजना या खऱ्या पात्र व गरजू लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजे. त्यांनीच या योजनांचा खऱ्या अर्थाने लाभ घेतला पाहिजे. लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेवून आपले जीवनमान उंचवावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सडक-अर्जुनी तालुक्यातील प्रविण मत्स्यपालन सहकारी संस्था मालीगुंजा या संस्थेचे सदस्य जनीराम मेश्राम यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसदार पत्नी धर्मशीला मेश्राम यांना केंद्र पुरस्कृत अपघात गटविमा योजनेचा १ लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला.
कार्यक्रमाला सडक-अर्जुनी तालुक्यातील विविध गावातील जवळपास १३ हजार लाभार्थी उपस्थित होते. या वेळी लाभार्थ्यांनी विविध विभागाच्या स्टॉल्सला भेट देवून त्यांच्याशी संबंधित असलेल्या योजनांची माहिती जाणून घेतली. योजनांचा लाभ घेण्यासाठी काही लाभार्थ्यांनी तेथेच अर्ज भरले. आता ६ आॅगस्टपर्यंत तालुक्यातील सर्व लाभार्थी विविध योजनांचा लाभ मिळण्याबाबतचे अर्ज तालुका समाधान नियंत्रण कक्षात पुरक कागदपत्रांसह सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व बार्टीच्या समतादुतांनी महत्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाला जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी मांडले. संचालन मेश्राम यांनी केले. आभार गटविकास अधिकारी बी.आर. लोकरे यांनी मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Benefits of schemes to each family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.