रोखरहित व्यवहार सामान्यांच्या हिताचे
By Admin | Updated: January 1, 2017 01:49 IST2017-01-01T01:49:29+5:302017-01-01T01:49:29+5:30
दैनंदिन व्यवहारामध्ये पारदर्शितपणा व्हावा, सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक होऊ नये, वेळेची बचत तसेच सहजरित्या

रोखरहित व्यवहार सामान्यांच्या हिताचे
एसडीओ पर्डीकर यांचे आवाहन : रोखरहित व्यवहारांचे प्रशिक्षण
बोंडगावदेवी : दैनंदिन व्यवहारामध्ये पारदर्शितपणा व्हावा, सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक होऊ नये, वेळेची बचत तसेच सहजरित्या परस्पर आर्थिक व्यवहार सुलभ होण्यासाठी रोखरहित व्यवहार फायदेशीर ठरतो. कॅशलेस व्यवहाराच्या पद्धतीने शासनासोबतच सामान्य जनतेलाही फायदा मिळणार आहे. बँकेमध्ये जाण्याचा वेळ खर्ची न घालता घर बसल्या रोखरहित व्यवहार करण्यासाठी समस्त जनतेने नि:संकोचपणे पुढे येण्याचे आवाहन प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल पर्डीकर यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये कॅशलेस व्यवहारासंदर्भात आयोजित रोखरहित व्यवहारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत तालुक्यातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तालुक्यातील विविध दुकानात सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्यासाठी गाव पातळीवरील नागरिकांमध्ये जनजागृती मार्गदर्शन करुन रोखरहित व्यवहारांचे प्रशिक्षण देण्यासंबंधी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सडक-अर्जुनीचे तहसीलदार तथा अर्जुनी मोरगावचे प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल पर्डीकर, अर्जुनी मोरगावचे तहसीलदार डी.सी. बोंबार्डे, ठाणेदार नामदेव बंडगर, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
तालुक्यातील शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, स्वस्त धान्य दुकानदार, रोजगार सेवक, पोलीस पाटील, वनविभागाचे कर्मचारी यांना रोखरहित व्यवहारासंबंधी प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना उपविभागीय अधिकारी पर्डीकर यांनी, अगदी सहज व साध्या पद्धतीने रोखरहित व्यवहार घरी बसून करता येतो. कॅशलेस पद्धतीने अर्थव्यवस्थेत पैसा कमी येणार. बँकेत जाण्याची गरज भासणार नाही.
एटीएम कार्डचा वापर करा. सर्वांना हिताचा ठरणारा कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सामान्य जनतेनी पुढे यावे. त्यांनी कॅशलेस व्यवहार करण्याची पद्धत भ्रमणध्वनीद्वारे प्रत्यक्षात प्रात्यक्षिकाद्वारे करुन दाखविले.
तर तहसीलदार बोंबार्डे यांनी, प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गावात जावून प्रत्येक कुटुंबाला रोख रहित व्यवहार कशाप्रकारे सामन्य जनतेला हितावह आहे हे पटवून देण्याचे आवाहन केले. ठाणेदार बंडगर, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, बँक व्यवस्थापकांनी सुद्धा कॅशलेस व्यवहारासंबंधी मार्गदर्शन केले.(वार्ताहर)