तलावाचे सौंदर्यीकरण रखडले

By Admin | Updated: May 2, 2015 01:47 IST2015-05-02T01:47:39+5:302015-05-02T01:47:39+5:30

येथील रेल्वे स्थानक व भीमनगर दरम्यान विस्तीर्ण असे रेल्वे तलाव पसरले आहे.

The beautification of the pond ran | तलावाचे सौंदर्यीकरण रखडले

तलावाचे सौंदर्यीकरण रखडले

गोंदिया : येथील रेल्वे स्थानक व भीमनगर दरम्यान विस्तीर्ण असे रेल्वे तलाव पसरले आहे. सध्या या तलाव परिसरात शहरातील घाण व कचरा घातला जातो. त्यामुळे दोन मिनिटेसुद्धा येथे थांबणे कठिण झाले आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव मागील पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत या प्रस्तावावर कसलीही कार्यवाही झाली नसल्याचेच समजून येते.
याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम राज्य शासन करणार होते. पाच ते सहा वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची बैठक झाली होती. त्यात सदर तलावाच्या सौंदर्यीकरणावर चर्चा होवून तसा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. गोंदिया रेल्वेला मिळालेल्या त्या प्रस्तावाची प्रत नागपूर डीआरएम कार्यालयाला पाठविण्यातही आली होती. मात्र सदर काम राज्य शासनाकडून होणार असल्याने पुढे काय झाले, याविषयी काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकाराला आता पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही सौंदर्यीकरण तर दूरच साधी सुधारणासुद्धा या तलावाची करण्यात आली नाही. यामागे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उदासिनता असल्याचे बोलले जाते. सध्या या तलाव परिसरात शहरातील प्लास्टिक, पॉलिथिन, केरकचरा, घाण घातली जाते. त्यामुळे येथे नेहमीच डुकरांचा वावर राहत असून दुर्गंधाने ये-जा करणाऱ्यांना कासाविस झाल्यासारखे वाटते. उन्हाळा लागल्यावरही या तलावात पाणी आहे. परंतु ते पाणी घाणीमुळे खराब झाले आहे.
लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून या तलावाचे सौंदर्यीकरण केले तर तेथे एक उत्तम प्रेक्षणिय स्थळ बनू शकते. विद्युत प्रकाशाची व्यवस्था, तलाव परिसरात बगिचा, परिसराची स्वच्छता, नागरिकांच्या बसण्यासाठी सिमेंट खुर्च्यांची सोय, तलाव व तलाव परिसरात घाण व कचरा साचू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्यास या तलावाचे सौंदर्य फूलेल. शिवाय शहरातील नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी किंवा विसाव्यासाठी येथे येवू शकतील. एकंदरीत हे तलाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरू शकेल. मात्र पाच ते सहा वर्षांच्या काळात तीन ते चार जिल्हाधिकारी बदलून गेले. या काळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. शिवाय लोकप्रतिनिधी व अनेक पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने कुणीही हा मुद्दा उचलून धरला नाही. त्यामुळे या रेल्वे तलावाचे सौंदर्यीकरणच विस्मरणात गेल्याचे दिसून येते.
सध्या हे तलाव परिसर कचऱ्याचे माहेरघर असून डुकरांचे आश्रयस्थान बनले आहे. पूर्वी या तलावातील पाण्यावर हिरवे शेवाळ पसरले होते. त्यामुळे तलावातील पाणी दिसत नव्हते, केवळ वरून हिरवेगार शेवाळच दिसून येत होते. यानंतर या तलावाची एकदा स्वच्छता करून ते शेवाळ काढण्यात आले होते. मात्र त्यानंतर या तलावाच्या कामाकडे सातत्त्याने दुर्लक्ष करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The beautification of the pond ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.