बोअरवेलच्या सुविधेसाठी बेरडीपार शाळा समिती आक्रमक
By Admin | Updated: May 23, 2014 00:03 IST2014-05-23T00:03:01+5:302014-05-23T00:03:01+5:30
तिरोडा पं.स.च्या करटी (बु.) केंद्रांतर्गत जि.प. उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार येथे येत्या २६ जूनच्या पूर्वी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात यावी. ही सुविधा झाली नाही

बोअरवेलच्या सुविधेसाठी बेरडीपार शाळा समिती आक्रमक
ंकाचेवानी : तिरोडा पं.स.च्या करटी (बु.) केंद्रांतर्गत जि.प. उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार येथे येत्या २६ जूनच्या पूर्वी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात यावी. ही सुविधा झाली नाही तर शाळा सुरु होवू देणार नाही, अशी भूमिका शाळा व्यवस्थापन समितीने घेतली आहे. बेरडीपार जि.प. शाळा सर्वात जुनी शाळा असून शाळेची स्थापना १९१२ ची आहे. ब्रिटिशकालीन असलेल्या या शाळेला १०२ वर्षे पूर्ण झालेले आहेत. मात्र या कालावधीत ग्रा.पं., जि.प., आमदार व खासदारांनी या शाळेत पिण्याच्या पाण्याचे खासगी साधन उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न केलेले नाही. सद्यस्थितीत शाळेत नळ योजनेची व्यवस्था शाळा समितीच्या सहयोगाने करण्यात आली. मात्र नळयोजना नियमित सुरू राहत नसल्याने तसेच नळ योजना सुरु असल्यावरसुद्धा साठवून ठेवण्याचे भरपूर साधन नसल्याने पाण्याची सुविधा नसल्यासारखे आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात अदानी फाउंडेशनकडून समर्शिबल यांत्रिक साधन उपलब्ध करुन दिल्याने ग्रा.पं. च्या बोअरवेलला ते साधन जोडण्यात आले होते. परंतु यावर्षी एप्रिल २०१४ मध्ये समर्शिबल यांत्र बाहेर काढून शाळेला परत करण्यात आले. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत शाळेत नसून विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. नळाचे पाणी उपलब्ध होत असले तरी २२५ विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळेत नळाद्वारे उपलब्ध होणारे पाणी विद्यार्थ्यांना पुरेसे नाही. पोषण आहार शिजविणे, पाण्याची नासाडी करता-करता पिण्याच्या उपयोगात आणणे, आणि महत्वाचे म्हणजे शौचालय आणि मुतारीकरिता लागणारे पाणी या समस्या पाहता नळाचे पाणी दुपारपर्यंतच कामी येते. यानंतर मुलांना प्यायला पाणी मुद्दाम राहत नाही. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात नळ बंद असल्याने मुलांना आणि शिक्षकांना पिण्याच्या पाण्याकरिता शाळेबाहेर किंवा पानटपरीवर तहान भागवायला जावे लागले. येत्या २६ जूनला शाळा सुरु होणार असून त्यावेळी उन्हाचा तडाखा असतो. शासनाने शाळेच्या पहिल्या दिवसापासून शालेय पोषण आहार शिजवून देण्याचे फर्मान जारी केल्यामुळे पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. शैक्षणिक सत्र २०१३-१४ मध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण भागली. यावर्षी बेरडीपार गावात अदानी फाउंडेशनच्या वतीने बोअरवेल देण्यात आल्या. परंतु ग्रा.पं. आणि अदानी फाउंडेशनने शाळेच्या गंभीर समस्यांना काजळीपूर्वक समजून घेतले नाही. अदानी फाउंडेशन शैक्षणिक सुविधा पुरविण्यास तत्पर असल्याचे ढिंडोरे पिटत आहे. परंतु बेरडीपार हे गाव अदानी फाउंडेशनच्या अधीन येत असूनसुद्धा विद्या मंदिरात बोअरवेलची सुविधा देण्यास असफल ठरली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम, आशा मेश्राम, सविता गौतम, धनवंता ठाकरे आणि सुरेश झगेकार यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना स्पष्ट सांगितले की, शाळा सुरु होण्यापूर्वी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नाही, तर शाळा सुरु होवू देणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकमतजवळ व्यक्त केलेली आहे. (वार्ताहर)