बंजारा समाजाचा तीज महोत्सव
By Admin | Updated: September 4, 2015 01:44 IST2015-09-04T01:44:24+5:302015-09-04T01:44:24+5:30
बंजारा समाज तीज महोत्सव समितीच्या वतीने आमगाव येथे सामाजिक चालीरितीप्रमाणे सांस्कृतिक तीज महोत्सव साजरा करण्यात आला.

बंजारा समाजाचा तीज महोत्सव
समाजबांधव एकत्र : विविध स्पर्धांत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
आमगाव : बंजारा समाज तीज महोत्सव समितीच्या वतीने आमगाव येथे सामाजिक चालीरितीप्रमाणे सांस्कृतिक तीज महोत्सव साजरा करण्यात आला. यात स्थानिक तसेच बाहेर गावावरून आलेला संपूर्ण बंजारा समाज एकत्र आला होता. मंगळवारी या उत्सवाची सांगता झाली.
प्राचीन काळापासून चालत आलेल्या या परंपरेला बाहेर जिल्ह्यातून नोकरीनिमित्त आलेल्या आपल्या समाजाला घेऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या महोत्सवाला मुकलेल्या समस्त बंजारा समाजातील कर्मचारी व अधिकारी एकत्र येऊन सांस्कृतिक तीज महोत्सव साजरा करण्यात आला.
पहिल्या दिवशी तीजचे प्रत्यारोपण आमगावचे नायब तहसीलदार शिशू पवार यांच्या राहते घरी करण्यात आला. त्या दिवसापाूसन दररोज नियमित समाजातील स्त्रिया रोज एकत्र येऊन बंजारा गीत व बंजारा नृत्य करीत. आदव्या दिवशी गणगोरा हा विशेष कार्यक्रम पार पडला. या दिवशी राधाकृष्णाची स्थापना करून सर्व स्त्रिया त्याच्या भोवती गीत गायन व नृत्य करून आनंद घेतला.
महोत्सवाच्या अंतिम दिवशी ३० आॅगस्ट रोजी रविवारी विसर्जन कार्यक्रम महादेवराव शिवणकर अध्यापक विद्यालय, बनगाव येथे घेण्यात आले. सकाळपासून स्त्रियांनी नाचगाण्याला सुरूवात केली. तर दुपारी प्रीतिभोज कार्यक्रम झाला. त्यानंतर लगेच संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या समाजबांधवाना संबोधित करण्यात आले.
अध्यक्षस्थानी वाघ आमगावचे सिंचन उपविभागीय अधिकारी शिवराम राठोड होते. अतिथी म्हणून तहसीलदार शक्करवार, नायब तहसीलदार शिशुपाल पवार, चिमूरचे खंडविकास अधिकारी विजय जाधव, उल्हास राठोड, गोरेगावचे विस्तार अधिकारी विलास राठोड, प्रा. बाबुसिंग राठोड, देवरीचे वनपरिक्षेत्राधिकारी रोशन राठोड, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, बी.एस. केसाळे, एम.पी. म्याकलवार, एन.जी. कानकडे आदी उपस्थित होते.
महोत्सवला आवर्जून पोलीस उपविभागीय अधिकारी रामदास राठोड उपस्थित झाले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात समाजातील विविध चालीरीती, रुढी-परंपरा यावर प्रकाश टाकला. तसेच समाज विकासासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन युवावर्गास केले. त्याचबरोबर नायब तहसीलदार शिशुपाल पवार यांनी समाजातील लोकांना सामाजिक बांधीलकी कमी असल्याची खंत व्यक्त केली. समाजाचे ऋण फेडणे आणि समाज, संस्कृती, भाषा याबद्दल अभिमान बाळगावे, असे सांगितले. प्रा. बाबुसिंग राठोड यांनी समाजाचा संपूर्ण इतिहास मांडला व पुढील वाटचाल कशी असावी, याविषयी मार्गदर्शन केले. शिवराम राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनातून नवीन पिढीतील तरुणांनी अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम घेऊन येणाऱ्या पिढीमध्ये आपले संस्कार रुजवावे व त्यांना नवीन मार्गदर्शन करावे, असे सांगून आपण यानंतरही नेहमी तत्पर असणार अशी घोषणा केली.प्रास्ताविक मयूर राठोड, संचालन मुरली चव्हाण यांनी तर आभार नरेंद्र राठोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी वनपरिक्षेत्राधिकारी ज्ञानेश्वर पवार, विस्तार अधिकारी विनोद जाधव, सूरज राठोड, विजय पवार, किशोर राठोड, नितू पवार, पूनम राठोड आणि विशाल राठोड आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)