दोघांचे पाच लाख रुपये करणार परत
By Admin | Updated: December 27, 2016 02:11 IST2016-12-27T02:11:40+5:302016-12-27T02:11:40+5:30
दिड महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक यंत्रणेच्या दक्षता व भरारी पथकांनी पाच

दोघांचे पाच लाख रुपये करणार परत
विधान परिषद निवडणूक : तिघांच्या ५० लाखांवर निर्णय नाही
गोंदिया : दिड महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक यंत्रणेच्या दक्षता व भरारी पथकांनी पाच ठिकाणांवरून पकडलेल्या एकूण ५५ लाखांच्या रकमेपैकी ५० लाखांच्या रकमेचा हिशेब अद्याप लागलेला नाही. त्यातील दोन जणांकडून पकडण्यात आलेली जवळपास ५ लाख १० हजारांची रक्कम त्यांना परत करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तिघांच्या रकमेचा तपास अजून पूर्णत्वास गेला नसून ती प्रकरणे पुन्हा समितीकडे ठेवण्यात येणार आहेत.
वास्तविक निवडणूक काळात संशयास्पद आर्थिक व्यवहारात जप्त करण्यात आलेल्या रकमेचा तपास आयकर विभागाकडे सोपविल्यानंतर १० दिवसात या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे. त्यासाठी १० अधिकाऱ्यांची एक समितीही गठीत करण्यात आली आहे. मात्र संबंधित विभागाच्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल दिड महिना पूर्ण होत आला तरी तीन प्रकरणे निकाली काढण्यात आलेली नाही. यासंदर्भात आयकर विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.
१६ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीच्या जीवन के नाथ यांच्याकडून २ लाख ५ हजार ५०० रूपये जप्त करण्यात आले होते. १७ नोव्हेंबर रोजी जुरीया येथील सतीशकुमार पटेल यांच्या जवळून पाच लाख ७ हजार ५०० रूपये जप्त करण्यात आले. या दोघांना त्यांची रक्कम परत करण्यात येणार आहे. परंतु मध्यप्रदेशातील जबलपूर येथून गोंदियाकडे येत असलेल्या इनोव्हा कारमधून १५ नोव्हेंबर रोजी एक हजार रुपयांच्या नोटांचे २० बंडल (२० लाख रुपये) पियुषकुमार प्रकाशचंद चौबे (४९), रा.वर्धमान नगर, राजनांदगाव (छत्तीसगड), यशवंतकुमार धनीराम जंघेल (२६) रा.चिखली (जि.राजनांदगाव) आणि गाडीचालक संतोष निसार (३३) रा.राजनांदगाव या तिघांकडून जप्त करण्यात आले होते.
ओरिसा राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या टोयोटा फॉर्च्युनर या वाहनातून देवरी सीमेवरील नाक्यावर २५ लाख रुपये कर्नलसिंह ताठे व तजेंद्रसिंह सिद्धू (दोघेही रा.नागपूर) यांच्याकडून जप्त करण्यात आले. एमएच ३१, डीसी ७१५७ या टोयोटा फॉर्च्युन वाहनातून २५ लाख रुपये वाहून नेत होते.
तसेच सडक-अर्जुनी येथील अजय लांजेवार यांच्याकडून गोरेगावजवळ १८ नोव्हेंबर रोजी २ लाख ८३ हजार रूपये मिळाले होते. या तिघांची रक्कम आता परत केली जाणार नाही. समितीसमोर हे प्रकरण आहे. यावर पुन्हा विचार केल्यानंतर पुढची कार्यवाही करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)