पुरस्कार प्राप्त गावांतच हागणदारी मुक्तीचा धुव्वा
By Admin | Updated: January 11, 2015 22:55 IST2015-01-11T22:55:01+5:302015-01-11T22:55:01+5:30
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्याने वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. मात्र आजघडीला त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. ग्रामीण भागात उघड्यावरील

पुरस्कार प्राप्त गावांतच हागणदारी मुक्तीचा धुव्वा
सालेकसा : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्याने वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. मात्र आजघडीला त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. ग्रामीण भागात उघड्यावरील हागणदारी रोजचेच चित्र झाले असून यंत्रणा कोठेतरी कमी पडत आहे. मात्र घाण व दुर्गंधी आजाराला आमंत्रण देत असून यावर प्रभावी योजनेची गरज आहे.
ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी. लोकांनी शौचालय बांधून त्यांचा वापर करावा व रोगांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २००० पासून राबविले. याशिवाय अन्य प्रोत्साहन योजना राबविल्या जात आहेत. यांतर्गत शौचालय बांधकामासाठी अनुदान देण्यात आले. मात्र असे असले तरीही ४० टक्के लोक उघड्यावर शौचास बसत आहेत. तर बांधण्यात आलेले शौचालय गोवऱ्या, काड्या व टाकाऊ वस्तू ठेवण्यासाठी उपयोगात आणले जात असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या सांगून शौचालयांचा वापर केला जात नाही अशी परिस्थिती दिसून आली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील पुरस्कार प्राप्त गावांतही योजनेचा धुव्वा उडाला आहे.
सालेकसा ते आमगाव या मुख्य मार्गावरील गावांत सकाळ-सायंकाळ रस्त्याच्याकडेला हा प्रकार दिसून येतो. जेव्हा मुख्य मार्गावरील ही अवस्था आहे तर आतील गावांबाबत न बोलणेच बरे. सन २००८ मध्ये जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायतींनी निर्मल ग्राम योजनेचा पुरस्कार पटकाविला.
नव्या-नव्यात सन २००९ ते २०१२ या काळात मोठ्या प्रमाणात शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. मात्र त्या शौचालयांचा वापर निम्मे लोकही करताना दिसून येत नाही. अनेक गावांमध्ये उघड्यावर हागणदारीचे चित्र अद्याप कायम आहे. तर स्वच्छता मोहीम मात्र काही कालांतराने संपुष्टात आल्याचे निर्दशनास येते.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या दुर्लक्षामुळे गावांत घाण व दुर्गंधी फोफावत चालली असून यातून आजारांना आमंत्रण मिळत आहे. अशात यावर तोडगा म्हणून ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्याकरिता नवीन संशोधन व उपाययोजना करण्याची गरज आहे. (वार्ताहर)