उन्हात काम करणे टाळा
By Admin | Updated: May 31, 2015 00:45 IST2015-05-31T00:45:41+5:302015-05-31T00:45:41+5:30
उष्माघातापासून बचावासाठी उन्हात काम करणे टाळावे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीस उष्माघात झाल्यास त्याला

उन्हात काम करणे टाळा
जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन : जिल्ह्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पार
गोंदिया : उष्माघातापासून बचावासाठी उन्हात काम करणे टाळावे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीस उष्माघात झाल्यास त्याला तत्काळ रूग्णालयात भरती करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअसवर गेल्याने उष्माघाताची शक्यता बळावली आहे. मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरानहाईट किंवा ४१ अंश सेल्सिअस यापेक्षा जास्त वाढल्यास उष्माघात होण्याचा धोका राहते. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे. याला वैद्यकीय आणीबाणी मानले जाते. उष्माघात हा मेंदू व शरीरातील अंतर्गत अवयवास हानी पोहोचवू शकतो. उष्माघात हा ५० वर्ष वयोगटातील लोकांना तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींनादेखील होण्याची शक्यता राहते. मानवी शरीराचे तापमान साधारणत: ३७ अंश सेल्सिअस (९८.६ अंश फॅरनहाईट) राहते. मानवी शरीराच्या तापमानाला समतोल राखण्याची क्रिया सुरू राहते. १०६ अंश फॅरनहाईट जास्त झाल्यास बेशुद्धावस्था येते. क्वचितप्रसंगी रूग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. उष्माघातापासून बचावासाठी शक्यतो उन्हात फिरणे किंवा अंग मेहनतीचे काम करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी केले आहे.
उन्हाळ्यातच शेतीपूर्व मशागतीला सुरूवात होते. शेतकरी दिवसभर उन्हामध्ये शेतीची कामे करतात. त्यामुळे ग्रामीण भागात उष्माघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आढळते. शेतकऱ्यांनी सकाळीच शेतावर जाऊन १० वाजतापर्यंत कामे करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
उष्माघातावर करावयाचा प्रथमोपचार
उष्माघाताच्या रूग्णाला सर्वप्रथम उष्णतेच्या ठिकाणापासून थंड ठिकाणी किंवा सावलीच्या जागेवर हलवावे, रूग्णाचे डोके व पाठीचा भाग समांतर भागापेक्षा थोडा उंचावर ठेवावा, डोक्यावर गार पाण्याच्या पट्या किंवा बर्फाची पिशवी ठेवावी, त्यानंतर थोड्या अंतराने थंड पाणी पिण्यास द्यावे, दरम्यानच्या काळात गरम किंवा उत्तेजित पदार्थ खाण्यास देऊ नये, रूग्णाच्या संपूर्ण शरीरावर गार पाण्याचे टॉवेल किंवा बेडशिट ठेवावे. रूग्णालयांनीही पूर्वतयारी ठेवावी.
ही आहेत उष्माघाताची लक्षणे
उष्माघात झाल्यास शरीराचे तापमान वाढणे, डोके दुखणे, चक्कर येणे, कमजोरपणा वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड होणे, गोंधळल्यासारखे वाटणे, खूप तहान लागणे, घाम कमी येणे, स्नायू कमकुवत होणे, त्वचा लाल- कोरडी होणे, थकवा येणे, भान हरपणे आदी लक्षणे दिसून येतात.
पूर्वतयारी करुन ठेवावी
वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रूग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, आरोग्य पथक येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसेच खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या रूग्णालयामध्ये आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवावी. उष्माघाताच्या रूग्णांकरिता शीतकक्ष, हवेशीर खोलीमध्ये पंखे, कुलर व वातानुकूलित साहित्य ठेवावे, असे आवाहन शल्यचिकित्सकांनी केले आहे.