जिल्ह्यात उभी होतेय बेरोजगारांची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST2021-09-15T04:34:41+5:302021-09-15T04:34:41+5:30
गोंदिया : जिल्ह्याचा दर्जा मिळाला. अनेक विकासकामेही झाली. मात्र उद्योग-व्यवसायांच्या बाबतीत जिल्हा आजही माघारलेला आहे. अदानी वीज प्रकल्प वगळता ...

जिल्ह्यात उभी होतेय बेरोजगारांची फौज
गोंदिया : जिल्ह्याचा दर्जा मिळाला. अनेक विकासकामेही झाली. मात्र उद्योग-व्यवसायांच्या बाबतीत जिल्हा आजही माघारलेला आहे. अदानी वीज प्रकल्प वगळता जिल्ह्यात अद्यापही मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे हाताला काम मिळेल अशा मोठ्या प्रकल्पाची प्रतीक्षा जिल्ह्यातील युवा वर्गाला असून, जिल्ह्यात बेरोजगारांची फौज उभी होत आहे. रोजगाराच्या नावावर लोकप्रतिनिधींकडून केवळ भूलथापा मिळत असल्याने बेरोजगार युवक आता वाममार्गाकडे वळण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणारे पुढारीही सध्या बेपत्ता झाले आहेत. गोंदिया जिल्ह्याला केंद्रात तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. परंतु खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास झालेला नाही. अलीकडे विकासाच्या बोंबा होत असल्या तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न कायमच आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने हाती असलेले कामही हिरावले, त्यामुळे सुशिक्षित युवकांपासून सर्वसामान्य मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे. परिणामी, दिवसेंदिवस जिल्ह्यात बेरोजगारांची फौज तयार होत आहे.
कोरोनाचाही फटका
जिल्ह्यात अदानीशिवाय दुसरे कुठलेही मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षितांना जिल्ह्यातून पलायन करूनच रोजगार उपलब्ध करणे भाग पडते. तर दुसरीकडे शेती व्यवसायाशिवाय रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य मजुरांची नेहमीच रोजगारासाठी भटकंती होत असते. उन्हाळा व हिवाळा या दोन सत्रांत जिल्ह्यातील मजूरवर्ग रोजगाराच्या शोधात परजिल्ह्यात जात असताे. मात्र, यावरही कोरोनामुळे संकट आले आहे.
मग जिल्हा विकसित कसा?
गोंदिया जिल्ह्यात वर्ष २०१५-१६, २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली. या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा देशपातळीवर पहिल्या १० क्रमांकांत राहिला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याला केंद्र शासनाकडून गौरवान्वितही करण्यात आले. परंतु, मनरेगा योजनेत गोंदिया जिल्हा रोजगाराच्या समस्येपासून होरपळत आहे हे उघड करून दिले. यावरून गोंदिया जिल्हा विकसित कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
औद्योगिक क्रांतीची प्रतीक्षा
जिल्ह्यात मुख्यत: भातपीक घेतले जाते. त्यातही खरीप हंगामावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी अवलंबून आहेत. यामुळे जिल्ह्यात मुख्य व्यवसाय शेती आहे. परंतु, यापलीकडे जिल्ह्यात रोजगाराच्या संदर्भात कसलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिक औद्योगिक क्रांतीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात सद्य:स्थिती
गोंदिया जिल्ह्यात आजघडीला वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार १३ लाख २३ हजार ६३५ एवढी लोकसंख्या आहे. जिल्ह्यात ३ लाखांच्या जवळपास कुटुंब संख्या आहे. शिक्षितांची टक्केवारी जवळपास ८५ टक्के आहे, गोंदिया जिल्ह्यात व्याप्ती ५२३४ वर्ग किमी आहे. जनसंख्येची घनता प्रतिकिलोमीटर २५६ आहे. त्या तुलनेत रोजगार नाहीच्या प्रमाणात आहे.