येमुला आत्महत्याप्रकरणी अर्जुनीत शांती मार्च
By Admin | Updated: February 3, 2016 02:00 IST2016-02-03T02:00:25+5:302016-02-03T02:00:25+5:30
अर्जुनी-मोरगाव: हैदराबाद विद्यापीठातील दलित समाजाचा गुणवंत विद्यार्थी रोहित येमुला या विद्यार्थ्यांच्या ...

येमुला आत्महत्याप्रकरणी अर्जुनीत शांती मार्च
शेकडोंचा सहभाग: तहसीलदारांना निवेदन
अर्जुनी-मोरगाव: हैदराबाद विद्यापीठातील दलित समाजाचा गुणवंत विद्यार्थी रोहित येमुला या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात तालुक्यातील समस्त बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत शांती मार्च काढून त्या पीएडचीधारक विद्यार्थ्यास आत्महत्या करेपर्यंत मानसिक त्रास देणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणी संबंधाने राष्ट्रपतींच्या नावाने असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरी जनतेच्या वतीने जातीयवादी, प्रवृत्तीचा बळी ठरलेल्या रोहित येमुला आत्महत्या प्रकरणी भव्य-दिव्य असा निषेध मोर्चा शनिवारी काढण्यता आला. मोर्चामध्ये तालुक्यातील ठिक-ठिकाणाहून हजारो बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या आत्मीयतेनी सहभागी झाले होते. शांती मोर्चाचे पथ संचालन तालुक्यातील समता सैनिक दलानी केले आहे.
शहरातील बौद्ध विहारामध्ये बुद्धवंदना घेऊन शांती मार्चचे प्रस्थान करण्यात आले. दुर्गा चौक, बाजार चौक, बसस्थानक मार्गांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये प्रस्थापित व्यवस्थेचा बळी ठरलेला रोहित येमुला याचे तैलचित्र अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. ज्या समाजामधून आपण आज पुढे आलो तव्दतच समाजातील झोपलेल्यांना जाग यावी असे दिशादर्शित करणाऱ्या तालुक्यातील काही मोजक्यांनीच भव्य अशा शांती मोर्चाचे नियोजन केले होते.
हजारो बौद्ध बांधवाचा सहभाग असलेल्या मोर्चाचे तहसील कार्यालयाच्या पटांगणात सभेत रुपांतर झाले. प्रा. प्रदीप भानसे यांनी रोहित येमुला या दलीत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मागची संपूर्ण परिस्थिती विशद केली.
सामाजिक कार्यकर्ते सोनदास गणवीर यांनी बुद्धवंदना घेऊन सामुहिक श्रद्धांजलीचे संचालन केले. तहसीलदार बोंबार्डे यांना निवेदन देण्यात आला.
गुणवंत असलेल्या एका दलित विद्यार्थ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)