बाबासाहेबांच्या विचारांवर आपण चाललो आहे का?
By Admin | Updated: April 24, 2016 01:54 IST2016-04-24T01:54:42+5:302016-04-24T01:54:42+5:30
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवनच संघर्षातून उत्थानाकडे जाणारे आहे. त्यांचे जीवनकार्य डोळ्यासमोर ठेवून आपण किती मैल चाललो.

बाबासाहेबांच्या विचारांवर आपण चाललो आहे का?
पालकमंत्र्यांचा सवाल : धापेवाडा येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम
गोंदिया : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवनच संघर्षातून उत्थानाकडे जाणारे आहे. त्यांचे जीवनकार्य डोळ्यासमोर ठेवून आपण किती मैल चाललो. त्यापेक्षा कोणत्या दिशेने चाललो याचा विचार होणे गरजेचे आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर आपण खरेच चाललो आहे काय? याचाही विचार गरजेचा झाला आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करण्याची गरज आज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील लोधीटोला/धापेवाडा येथे मंगळवारी आनंद बुद्ध विहार समितीच्यावतीने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आमदार भजनदास वैद्य, जिल्हा परिषद सभापती छाया दसरे, सरपंच गोविंद बघेले, पंचायत समिती सदस्य गुड्डू लिल्हारे, निना पटले, अजित मेश्राम, भैय्यालाल सूर्यवंशी, परमानंद मेश्राम, सुरेंद्र मेश्राम, गजभिये, लांजेवार, आत्माराम दसरे, धनंजय वैद्य, उरकुडे, विष्णू नागपुरे, रहांगडाले आदी मान्यवर उपस्थित होते.
ना.बडोले पुढे म्हणाले की, जातीविरहित समाज निर्मिती हे बाबासाहेबांचे स्वपन होते. ते आजही पूर्ण झालेले नाही. कारण त्यांना अभिप्रेत आर्थिक समता, सामाजिक समता आजही निर्माण झालेली नाही. बाबासाहेब आपल्या सर्वांचे बाप होते, असे सांगून ना.बडोले म्हणाले, बाबासाहेबांचे विचार घराघरात रुजावे यासाठी आपण बाबासाहेबांचे लंडन येथील घर असो, की इंदू मिलमधील भव्य स्मारकाचे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. तसेच, जनकल्याणाच्या अनेक योजना सुरू केल्या असून युपीएससी परीक्षेकरिता ५० विद्यार्थ्यांना संधी दिली.
आयएएस कोचिंगकरिता नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे क्लासेस सुरु केले. कौशल्य विकासातून जिल्ह्यातील ९५० युवकांना नोकरी उपलब्ध केली. ओबीसींची क्रिमिलेअर मर्यादा ६.५० लाख रुपयांपर्यंत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. खेड्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांच्या जयंतीदिनी ‘ग्राम उदय से भारत उदय’ हा उपक्रम देशात सुरू आहे. समता प्रतिष्ठान सुरू करण्याचे काम सुरू आहे. या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण व संशोधन करण्याची उपलब्ध होणार असल्याचे सांगीतले.
दरम्यान जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, भजनदास वैद्य यांनी ही उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. तसेच यावेळी आयोजकांतर्फे ना. बडोले व जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अजित मेश्राम यांनी केले. आभार गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
आयोजकांनी केला सत्कार
युवकांना रोजगार व अभ्यासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सुरू असलेले प्रयत्न तसेच बाबासाहेबांचे लंडन येथे घर खरेदी, इंदू मीलची जागा आदि महत्वाचे विषय हाताळणाऱ्या पालकमंत्री बडोले यांच्या याप्रसंगी आयोजकांकडून सत्कार करण्यात आला. सोबतच भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांचाही सत्कार करण्यात आला.