झाडीपट्टीच्या कलाकारांना राजाश्रय द्या

By Admin | Updated: March 27, 2016 01:50 IST2016-03-27T01:50:06+5:302016-03-27T01:50:06+5:30

नाटकासाठी आयुष्य झिजवून समाजाला मनोरंजनातून जनजागृती देणाऱ्या कलावंतांची आज ससेहोलपट होत आहे.

Approach the Shrimp Artists | झाडीपट्टीच्या कलाकारांना राजाश्रय द्या

झाडीपट्टीच्या कलाकारांना राजाश्रय द्या

रंगभूमी दिन विशेष : जिल्ह्यातील नाट्यकलावंतांची शासनाकडून अपेक्षा
नरेश रहिले गोंदिया
‘कलाकारांना श्राप आहे की वरदान आहे,
रंगभुमीवर त्याला मान आहे,
तरी समाजाच्या नजरेत तो बदनाम आहे’
हे शब्द झाडीपट्टीतील कलावंत, नाटककार, कलाकार, निर्माता व दिग्दर्शक शेखर पटले यांचे आहे. नाटकासाठी आयुष्य झिजवून समाजाला मनोरंजनातून जनजागृती देणाऱ्या कलावंतांची आज ससेहोलपट होत आहे. मुख्यमंत्री पूर्व विदर्भातील असले तरी त्यांचे झाडीतील कलेकडे दुर्लक्ष आहे. त्यांनी झाडीपट्टीतील कलावंतांच्या उत्थानासाठी या रंगभूमीला राजाश्रय द्यावा, असा सूर शेखर पटले या सुप्रसिद्ध नाट्यकलावंताने व्यक्त केला.
जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने शेखर पटले यांच्याशी केलेल्या चर्चेत त्यांनी झाडीपट्टीतील कलावंतांची अवस्था किती विदारक आहे याचे चित्र मांडले. कलावंत नाटकात सहा महिने सेवा देताना आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतो. त्याच्या परिवारावर उपाशी मरण्याची पाळी येऊ नये म्हणून आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांना खेचून आणून त्या मिळकतीवर उदरनिर्वाह करतो. परंतु त्या खऱ्या कलावंताकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन अत्यंत वाईट आहे.
आज अभिनयालाही व्यावसायिक स्वरुप आले, असे अनेकांचे म्हणणे आहे हे चुकीचे असल्याचे पटले सांगतात. अभिनय करताना कलावंतांनी आपल्या मुलांना माती चारायची का? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी कलावंतांनी आपल्या कामाचा मोबदला म्हणून दोन पैसे का घ्यायचे नाहीत? समाजात शिक्षक व इतर घटकही सेवा करताना पैसे घेतात. मग त्यांच्यावर व्यवसाय करीत असल्याचा आरोप का केला जात नाही. ज्यांनी रंगभूमीवर काम केले परंतु प्रेक्षक ज्यांना पसंत करीत नाहीत, असेच असंतुष्ट लोक रंगभुमीतून समाज प्रबोधन कमी आणि मनोरंजन जास्त वाढल्याचा आरोप करतात. परंतु समाजात प्रबोधनाची कामे करणारी मंडळे व्यासायिक नाहीत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
संपूर्ण रात्र अभिनय करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना फक्त एका व्यक्तीकडून ५० रुपये मिळतात. ज्यातून त्याच्या कुटुंबाचे तो पोट भरतो. त्या पैशात काही असंतुष्ट लोकांना व्यवसाय दिसत असेल तर २०० रुपयांची दारु पिऊन जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांनी कलावंतांवर टिका करणे चुकीचे आहे. कलावंतांनाही पोट आहे. ‘पेट में अनाज रहेंगा तो गाने का नाज रहेंगा,’ असे सांगत आज प्रत्येक क्षेत्र व्यापारी झालेले आहेत. शाळांचा व्यापार मांडला. परंतु नाटकातून कमावलेल्या पैशातून दोन वेळच्या जेवनाची सोय करण्याची तत्परता दाखविणाऱ्या कलावंतांनी आज उपाशी राहूनच काम करावे का? अनेकदा नाटकाच्या उद्घाटनाला लोकप्रतिनिधी येतात. भाषण करताना नाटकावर टिका करतात. परंतु ते लोकप्रतिनिधी अशाच नाटकातून प्रसिद्धी मिळवून मोठे राजकारणी म्हणून स्वत:ला मिरवितात. त्यांनी मुळ परिस्थितीला विसरू नये, असाही सल्ला शेखर पटले यांनी दिला.
या झाडीपट्टीतील अनेक कलावंत महाराष्ट्रात गाजले. त्यात शेखर पटले, चंद्रपृूरचे शेखर डोंगरे, चिचडगचे ज्ञानेश्वर कापगते, चंद्रपूर जिल्ह्यातील कमलाकर बोरकर, मालडोंगरी येथील हिरालाल पेंटर, भंडारा येथील आत्माराम खोब्रागडे यांचा समावेश आहे. परंतू दिवसेंदिवस झाडीपट्टीचे ‘अच्छे दिन’ लोप पावण्याची शक्यता आहे.

नाट्यकलावंतांना चित्रपटाची संधी
शेखर पटले यांनी झाडीपट्टीचा कलावंत म्हणून काम करताना ३ हजार नाट्यप्रयोग सादर केले. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ व पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली, सातारा येथे त्यांनी झाडीपट्टीचा नावलौकिक वाढविला. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी झाडीचे नाटक नेण्याचे धाडस दाखविले. झाडीतील कलावंताची सिनेसृष्टीतील लोकांशी ओळख व्हावी यासाठी त्यांनी २०१३ मध्ये ‘लाल चुडा’ नावाचा चित्रपट काढला. या चित्रपटात ५० झाडीपट्टीतील कलावंतांना संधी देण्यात आली.
झाडीपट्टी नाट्य अवार्ड महोत्सव
झाडीपट्टीतील कलावंतामध्ये सुप्त गुण आहेत. परंतु त्यांचा सत्कार झाला नाही. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी दसऱ्यापर्यंत झाडीपट्टी नाट्य अवार्ड महोत्सव आयोजित करुन गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या चार जिल्ह्यातील कलावंतांचा सत्कार करु. यासाठी मुख्यमंत्री, वित्तमंत्री, सांस्कृतिक मंत्री व मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्यांना बोलावणार असल्याचे शेखर पटले म्हणाले.

तीन हजारांवर नाट्यकलावंतांची उपेक्षा
गोंदिया जिल्ह्यासह झाडीपट्टीतील तमाम राजकारण्यांवर रोष दाखवित झाडीपट्टीत ३ हजारांपेक्षा अधिक कलावंत आहेत. झाडीपट्टीतील कलावंतांचे उत्थान व्हावे यासाठी आमदारांनी प्रश्नच उपस्थित केला नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष याकडे वेधल्या गेले नाही. सध्याचे मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. झाडीपट्टी म्हणून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल येथील मूळ रहिवासी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून येथील कलाकारांची कदर होईल अशी अपेक्षा आहे. झाडीपट्टीतील दिवंगत कलाकारांच्या कुटुंबियांना मदत द्यावी, वृद्ध कलाकार व सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कलाकारांना राज्य शासनाचे राजाश्रय द्यावा, अशी मागणी शेखर पटले यांनी केली आहे.

Web Title: Approach the Shrimp Artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.