गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 21:35 IST2021-05-08T21:34:46+5:302021-05-08T21:35:06+5:30
Gondia News सध्या रब्बी धान पिकाची कापणी व मळणी सुरू आहे. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासूनच दररोज अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कुठे ना कुठे विजांच्या कडकडाटासह वादळ वारा व पाऊस हजेरी लावत असल्याने धान उत्पादक शेतकरी चिंतित आहे.

गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अर्जुनी-मोर तालुक्यात इटीयाडोह धरणाच्या सिंचनाने रब्बी हंगामात पिकाचे उत्पादन घेतले जाते. रब्बी धान पिकाची लागवड जानेवारी महिन्यात केली जाते, तर त्याचे उत्पादन मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात येते. सध्या रब्बी धान पिकाची कापणी व मळणी सुरू आहे. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासूनच दररोज अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कुठे ना कुठे विजांच्या कडकडाटासह वादळ वारा व पाऊस हजेरी लावत असल्याने धान उत्पादक शेतकरी चिंतित आहे.
मागील तीन चार दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात मोठ्या डौलाने धान पीक बहरलेले आहे. वादळी वारा व पाऊस यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील धान पीक आडवे पडलेले आहे. लोंबीवरील धानाचे लोंब आहेत. त्यामुळेसुद्धा उत्पादन कमी होत आहे तसेच कापणी झालेल्या धानावर अवकाळी पावसामुळे कडपा पुन्हा वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
माझ्या शेतात रब्बी हंगामात धान पिकांची लागवड केली आहे. यावर्षी कीटकनाशकांचा खर्च कमी आलेला असून, पीक समाधानकारक होते. मात्र मागील तीन चार दिवसांपासून अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता बळावली आहे.
- श्रीराम भावे शेतकरी, इसापूर
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात रब्बी हंगामात सर्वत्र धान पिकाची लागवड केली आहे. यंदा रब्बी धानाचे पीकसुध्दा चांगले आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हाती आलेले पीक वाया जाण्याची शक्यता आहे.
- केवल शेंडे, शेतकरी, इसापूर