कृषी विभागाने चार गावे घेतली प्रकल्पात
By Admin | Updated: July 8, 2014 23:33 IST2014-07-08T23:33:07+5:302014-07-08T23:33:07+5:30
उत्पादन व उत्पादकता वाढविण्याकरिता राष्ट्रीय व राज्य कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीकरिता व हिताकरिता विविध योजना राबविते. कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकरी या योजना अंमलात आणतात.

कृषी विभागाने चार गावे घेतली प्रकल्पात
काचेवानी : उत्पादन व उत्पादकता वाढविण्याकरिता राष्ट्रीय व राज्य कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीकरिता व हिताकरिता विविध योजना राबविते. कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकरी या योजना अंमलात आणतात. मात्र प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाला अपेक्षित यश मिळत नाही. अशाच योजनेचे प्रकल्प तिरोडा तालुक्यातील चार गावात राबविले जात असून या योजनेतून एक हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
सदर राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे नाव राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान प्रकल्प असून एका गावात २५० शेतकऱ्यांना लाभ द्यायचे आहे. एच.एम.टी धानाचे प्रति २ किलो बियाणे (मोफत) ०.४० हे.आर. क्षेत्रावर ‘श्री पद्धतीने’ लागवड करायच्या दृष्टीने आणि उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याच्या अन्य गावातील शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान प्रकल्प यापूर्वी कृषी विभाग विखुरलेल्या पद्धतीने राबवित होता. अर्थात काही गावातील एक किंवा दोन शेतकऱ्यांना या प्रकल्पात समाविष्ठ करण्यात येत होते.
मात्र याचा लाभ दिसून येत नसल्याने शासनाच्या कृषी विभागाने यात सुधारणा केली. तालुक्याच्या चार गावांची निवड करुन एका गावात २५० शेतकऱ्यांना बियाणे व निविष्ठा (खत, औषधी, स्प्रे पंप) देवून सदन व संकरीत शेती करायला प्रोत्साहित करण्यात यावे, यातून शेतकरी प्रत्यक्षात अनुभव घेतील आणि त्याचे अनुकरण अन्य गावचे शेतकरी करतील, यासाठी या प्रकल्पात सुधारणा करुन राबविण्याचे कार्य कृषी विभागाला देण्यात आले आहे.
तिरोडा तालुक्यात कृषी सहायक नागदेवे यांच्या कार्यक्षेत्रातील ठाणेगाव येथे सदन (सुधारित) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंडीकोटा मंडळ कृषी अंतर्गत कृषी सहायक शिंदे यांच्या सहाकर्याने खुरखुडी येथे संकरीत धान्य प्रकल्प राबविण्यात येत आहे. खोडगाव येथे कृषी सहायक जी.आर. फटींग यांच्यामार्फत सदर (सुधारित) प्रकल्प राबविला जात आहे.
अत्री येथे कृषी सहायक सलामे यांच्यामार्फत संकरीत धान्य प्रकल्प राबविला जात आहे.ठाणेगाव, खुरखुडी, खोडगाव आणि अत्री या चार गावांच्या एक हजार शेतकऱ्यांना प्रकल्पाचा लाभ होणार आहे. एकत्र प्रकल्प राबविल्याने त्याचा चांगला फायदा दिसून येईल.
या शेतकऱ्यांचा अन्य गावचे शेतकरी अनुकरण करुन सुधारित व संकरीत जातीचा वापर करुन लाभ घेतील, असा विश्वास ठाणेगाव परिसराचे कृषी पर्यवेक्षक्ष डी.एस. पारधी यांनी लोकमतजवळ व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी के .आर. रहांगडाले यांच्यासह सर्व पर्यवेक्षक, कृषी सहायक आणि शेतकरी सर्वांच्या सहयोगाने हे प्रकल्प यशस्वी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे अशी की, बियाण्यांची बचत, श्री पद्धतीने लागवड करणे आणि उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने गावात सभा घेवून प्रात्यक्षिक बीज प्रक्रिया करणे, गादी वाफे तयार करुन घेणे, पेरणीचे कामे करुन घेणे ही आहेत.
ही कामे कृषी विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शेतकरी करणार आहेत आणि कृषी विभाग ते करवून घेणार आहे. (वार्ताहर)