तंटामुक्त गावात पुन्हा अवैध दारूची विक्री जोमात
By Admin | Updated: April 20, 2017 01:06 IST2017-04-20T01:06:04+5:302017-04-20T01:06:04+5:30
गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने एक आदेश काढून

तंटामुक्त गावात पुन्हा अवैध दारूची विक्री जोमात
परवानाप्राप्त दारू दुकान बंदीमुळे फावले : पुनर्मूल्यांकन न झाल्याने समित्या उदासीन
गोंदिया : गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने एक आदेश काढून गावागावांत चालणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांच्या भट्ट्या बंद पाडून त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळवावे, असे आवाहन केले होते. त्या धर्तीवर गोंदिया जिल्ह्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने हा उपक्रम चालवून अवैध दारू बंद केली होती. परंतु आता पुन्हा ही अवैध दारू जोमाने सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील ५५१ तंटामुक्त गाव समित्यांनी जिल्ह्यातील हजारो अवैध दारू विक्रेत्यांची दुकाने बंद पाडली होती. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचा पुरस्कार घेतल्यानंतर आता शासन गावांचे पुनर्मूल्यांकन करीत नसल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या उदासीन झाल्या आहेत. परिणामी त्यांनी अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष केले आहे.
गावातील अवैध दारूमुळे वाढणारे तंटे सोडविणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला जड होण्याची स्थिती पुन्हा येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने क्रमांक एम. आय.एस. १००७/सी.आर. २३८/पोल-८ दि.१९ जुलै २००७ व शासन निर्णय गृहविभाग एम. आय. एस. १००८/सी.आर.४३/२००८ पोल-८ दि.१४ आॅगस्ट २००८ व वी.स.आ.१००८/६६९/ प्र.क्र.८१/0८ पोल-मंत्रालय मुंबई अनुसार २४ नोव्हेंबर २००८ रोजी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे व त्याचे निर्मूलन करण्यासाठी निर्णय काढला. या निर्णयामुळे गावागावांत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गदा आली होती. परंतु त्या विक्रेत्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचे काम महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी केले होते. शासनाला तंटामुक्त समित्यांनी तीन वर्षाने तंटामुक्त गावांचे पुनर्रमुल्यांकण करून त्या मुल्यांकणात पात्र ठरलेल्या गावांना बक्षीस म्हणून पहिल्यावेळी दिलेल्या बक्षीसाच्या रकमेची २५ टक्के रक्कम प्रोत्साहित राशी म्हणून देण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु सतत होणाऱ्या या मागणीकडे शासनाने लक्ष न दिल्याने तंटे सोडविण्यात किंवा गावातील अवैध धंद्याचे उच्चाटन करण्यासाठी तंटामुक्त गाव समित्या मागे पडल्या आहेत. परिणामी गावात अवैध दारूची दुकाने आता गल्ली-गल्लीत सुरू होत आहेत. या अवैध दारूतून गावाचे वातावरण दूषित वातावरण होण्यास सुरूवात होत आहे. यामुळे आर्थिक नुकसानी बरोबर कुटुंबाची व समाजाची शांतता धोक्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
तंटामुक्तीला पोलीस मित्रांचा लाभ नाही
गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. आता पोलीस विभागाने पोलीस मित्र उपक्रम सुरू केला आहे त्याचा लाभ तंटामुक्त मोहीमेला झाला नाही. गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्तापित करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम काम करते. तसेच गावागावातील पोलीस मीत्र शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यास पोलिसांना मदत करण्यासाठी पोलीस मित्र तयार करण्यात आले. गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समितीला पोलीस मित्र नक्कीच मदत करणार अशी अपेक्षा होती. दोन्ही संकल्पना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच होता. परंतु पोलीस मित्र संकल्पना कागदावरच दिसत आहे.