आगडोंब
By Admin | Updated: December 22, 2016 00:50 IST2016-12-22T00:50:00+5:302016-12-22T00:50:00+5:30
बुधवारचा दिवस गोंदियाच्या इतिहासात काळा दिवस ठरला. संपूर्ण गोंदिया पहाटेच्या साखरझोपेत असताना गोरेलाल चौकात मात्र एकच आगडोंब उठला होता.

आगडोंब
गोंदिया : बुधवारचा दिवस गोंदियाच्या इतिहासात काळा दिवस ठरला. संपूर्ण गोंदिया पहाटेच्या साखरझोपेत असताना गोरेलाल चौकात मात्र एकच आगडोंब उठला होता. मुख्य चौकातील हॉटेल बिंदल आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते. सर्वत्र एकच धावपळ सुरू होती. बाहेरच्या कडक थंडीतही या उष्ण ज्वाळांनी घटनेचे प्रत्यक्षदर्शी असणाऱ्यांच्या शरीरालाच नाही तर मनालाही चटके लागत होते. गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आगेने सर्वच जण हादरून गेले होते. ही आग जेवढी बाहेरून भयानक दिसत होती त्यापेक्षा कितीतरी पटींनी हॉटेलच्या आतून धगधगत होती. त्यात होरपळून आणि गुदमरून सात जीवांना नाहक प्राणाला मुकावे लागले. काय अपराध होता त्यांचा? त्यांच्या या अपघातील मृत्यूला कोण जबाबदार आहेत? त्यांच्यावर काय कारवाई होणार? असे प्रश्न या घटनेने निर्माण केले आहेत.
गोरेलाल चौकातल्या या भीषण आगीने प्रत्येक जण हळहळला. या आगीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीपेक्षाही त्यात होरपळून दगावलेल्या जीवांमुळे झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. त्यामुळेच ही आग गोंदियावासीयांसाठी मोठा धडा देणारी ठरली आहे.
ही आग नेमकी कशी लागली, ती एवढी वाढली कशी आणि हॉटेलमधील लोकांना बाहेर पडण्याची संधी का मिळाली नाही? अशा अनेक घटनांचा ‘लोकमत’ने मागोवा घेतला. त्यात अनेक तथ्य समोर आले.
मार्केट परिसरात गस्तीवर असणारे पोलीस पहाटे ३ च्या सुमारास याच हॉटेलसमोरून गेले. रात्रभराची गस्त झाल्यामुळे ते थोडे निवांत झाले असतानाच ४ वाजताच्या सुमारास त्यांना आगीची माहिती मिळाली. हॉटेल बिंदलच्या इमारतीमध्येच असलेल्या झी महासेलमधून शॉर्ट सर्किट होऊन आगीची ठिणगी पडली. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न असफल होऊन ती भडकत जाताच झी महासेलच्या संचालकांनी तेथून काढता पाय घेतला. आरडाओरड सुरू झाल्याने अग्निशमन विभाग व पोलिसांना सूचना देण्यात आली. गोंदियाचे न.प.च्या दोन अग्निशमन बंबांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते.
अदानी पॉवर प्रकल्प तिरोडा आणि बालाघाट न.प.चा अग्निशमन बंब दाखल झाल्यानंतर त्यांनी वरपर्यंत पसरलेल्या आगीला नियंत्रित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केला. त्यामुळे ही आग आजुबाजूच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पसरण्यापासून वाचविता आले. मात्र बाजुच्या नर्मदा कलर लॅबच्या वरच्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा पसरून तेथील फोटोग्राफीचे साहित्य जळून खाक झाले. आठ ठिकाणच्या बंबांनी आग विझविण्यात आली.
आग विझली तरी धग कायम...
गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारी ही आग ठरली. अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर नगर परिषदेचा अग्निशमन बंब, हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असताना हॉटेलमध्ये अडकलेल्या सात लोकांना कोणीच काढू शकले नाही. यात बाहेरून प्रयत्न करणाऱ्या यंत्रणांपेक्षा सर्वाधिक दोष हॉटेलच्या संचालकाचाच असल्याचे समोर येत आहे.
या हॉटेलमध्ये आगप्रतिबंधक कोणत्याही उपाययोजना नव्हत्या. आकस्मिकपणे बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाकडून या हॉटेलला कोणतेही नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा नव्हते. त्यामुळे हॉटेलची ही आग विझली असली तरी नियमबाह्य कामांची धग गोंदियावासीयांच्या मनातही आहे. ती कुरपत जाऊन मोठा आगडोंब लागण्यापूर्वीच अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी सावरणे गरजेचे झाले आहे.
चौकाच्या चारही बाजूंचे रस्ते केले ब्लॉक
आगीच्या घटनेचे वृत्त पाहता पाहता गोंदिया शहरभर पसरले. आगीची तीव्रता भीषण असल्याचे समजल्यानंतर घटनास्थळीकडे धाव घेणाऱ्या बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे अतिरिक्त पोलीस कुमक बोलवून चौकाच्या चारही बाजुंनी रस्ते अडवून ठेवले होते. सायंकाळपर्यंत ही स्थिती होती.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचे नियंत्रण
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अभिमन्यू काळे, अपर पो.अधीक्षक संदीप पखाले, घटनास्थळी दाखल झाले. शहर ठाण्याचे निरीक्षक शुक्ला यांनी दुपारपर्यंत परिस्थिती सांभाळली. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी लक्ष दिले.
कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज
या आगीत मोठ्या प्रमाणात हॉटेलचे नुकसान झाले. संपूर्ण चारही मजल्यावर आग पसरल्यामुळे हॉटेलमध्ये काहीच शिल्लक राहिले नाही. सर्व किमती साहित्य, एसी, बेड, लाकडी साहित्य आदी जळून राख झाले. विशेष म्हणजे पीओपी आणि कारपेट यामुळे आग लवकर पसरली.
नेतेमंडळींनी केली धावपळ
आगीच्या घटनेची माहिती मिळताच आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.राजेंद्र जैन यांच्यासह गप्पू गुप्ता, अशोक इंगळे, पंकज गुप्ता, लोकेश गुप्ता, निखील जैन, विशाल अग्रवाल आदींनी धाव घेतली. दुपारी ना.राजकुमार बडोले व खा.नाना पटोले यांनी भेट दिली.
२० मिनिटे आधी सोडले हॉटेल !
बिंदलमधील क्रमांक ३०२ च्या खोलीत बालाघाट जवळील लिंगा गावचे डॉ.अमृत व संतोषी रक्षिया हे दाम्पत्य थांबले होते. त्यांनी पहाटे ३.३० वाजता हॉटेल सोडले. पहाटे ४ वाजताची ट्रेन त्यांना पकडायची होती. मात्र त्यांना पोलीस चौकशीसाठी बोलवणार आहे.