१२ व्या ग्रीन लिस्टनंतरही १८ हजार शेतकरी वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:36 IST2018-11-12T21:35:47+5:302018-11-12T21:36:07+5:30
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ८५ हजारावर शेतकरी प्राथमिक तपासणी पात्र ठरले होते. कर्जमाफी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या एकूण १२ याद्या आत्तापर्यंत जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना प्राप्त झाल्या आहेत.

१२ व्या ग्रीन लिस्टनंतरही १८ हजार शेतकरी वेटिंगवर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ८५ हजारावर शेतकरी प्राथमिक तपासणी पात्र ठरले होते. कर्जमाफी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या एकूण १२ याद्या आत्तापर्यंत जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ६७ हजार शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्य करण्यात आले. तर १८ हजार शेतकरी अद्यापही वेटिंगवर असल्याचे चित्र आहे.
मागील वर्षीच्या दुष्काळाने जिल्हयातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांवर निसर्ग कोपल्याने चांगली आर्थिक कोंडी झाली. शासनाने मागील वर्षी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली.
यासाठी जिल्ह्यातील ८५ हजारावर शेतकरी पात्र ठरले. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर या अर्जांची पडताळणी करुन येलो, ग्रीन, रेड अशा याद्या तयार करण्यात आल्या. ग्रीन यादी ही अंतीम असून या यादीत समावेश असलेल्या शेतकºयांचे कर्ज खाते शून्य करण्यात आले.
जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांना आत्तापर्यंत एकूण १२ ग्रीन याद्या प्राप्त झाल्या असून ६७ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी १६० कोटी रुपयांचा निधी बँकाना देण्यात आला. १२ व्या यादीनंतरही जिल्ह्यातील १८ हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे.
महाआॅनलाईनकडून बँकाना ग्रीन याद्या प्राप्त होण्यास विलंब झाल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहण्याची पाळी आली. कर्जमाफीच्या घोषणेला १४ महिन्याचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
१३ व्या यादीकडे लक्ष
महाआॅनलाईनने आत्तापर्यंत बँकांना १२ ग्रीन लिस्ट पाठविल्या असून त्यात ६७ हजार शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांचे कर्ज खाते शून्य करण्यात आले. बँकांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ग्रीन लिस्ट लवकरच प्राप्त होण्याची शक्यता असून ही शेवटची यादी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या यादीत नेमक्या किती शेतकºयांचा समावेश असेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँक आघाडीवर
जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी खातेदार हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहे. या बँकेने आत्तापर्यंत ६४ हजारावर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करुन त्यांचे खाते शून्य केले आहे. राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकेच्या तुलनेत जिल्हा बँक कर्जमाफीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात आघाडीवर आहे.
जिल्हा बँकेला आत्तापर्यंत एकूण १३ ग्रीन लिस्ट प्राप्त झाल्या असून या यादीमध्ये समावेश असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. महाआॅनलाईनकडून लवकरच १३ वी ग्रीन लिस्ट प्राप्त होण्याची शक्यता आहे.
सुरेश टेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा बँक.