आदिवासी समाज विकासापासून दूर
By Admin | Updated: May 29, 2015 01:24 IST2015-05-29T01:24:59+5:302015-05-29T01:24:59+5:30
आदिवासी जमातीची स्वतंत्र बोली भाषा, वेशभूषा, रुढी, परंपरा व संस्कृती आहे. ती इतर जातीच्या संस्कृतीपेक्षा भिन्न आहे.

आदिवासी समाज विकासापासून दूर
शेंडा (कोयलारी) : आदिवासी जमातीची स्वतंत्र बोली भाषा, वेशभूषा, रुढी, परंपरा व संस्कृती आहे. ती इतर जातीच्या संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. आदिवासी जमातीची भारतीय इतिहासात एक वेगळी ओळख आहे. परंतु राजकीय नेते स्वत:च्या स्वार्थासाठी आदिवासींची कुचंबना करीत आहेत. तसेच आदिवासी समाजातील राजकीय नेतेसुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळून आदिवासी जमातीच्या पोटात खंजीर खूपसण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आजही आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर असल्याचा आरोप आदिवासी संघटनांकडून केला जात आहे.
आदिवासी समाजाला आजतोवर देशपातळीवर समाजाचे नेतृत्व करणारा कणखर नेता मिळाला नाही. समाजाचे नेतृत्व करण्याचा आव बाळगणारे राजकीय नेते स्वत:च्या स्वार्थापोटी समाजाला राजकारणाच्या काळ्या बाजारात विकण्याचा कुटील डाव रचतात. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर आहे, असे नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघ, आॅल इंडिया आदिवासी कर्मचारी संघटनांनी प्रसिद्धी पत्रांद्वारे कळविले आहे.
खा. अशोक नेते स्वत: आदिवासी समाजाच्या आरक्षण कोट्यातून खासदार झाले. त्याच समाजाच्या अधिकाराचे व आरक्षणाचे हनन करण्याचा कुटील डाव खेळत असाल तर नैतिक जबाबदारी स्वीकारुन आदिवासी आरक्षणातून मिळालेले खासदारकीचे पद सोडावे व नंतर समाज विरोधी खेळी करण्यास मोकळे आहात, अशी टीका आदिवासी संघटनेच्या नेत्यांंनी केली आहे.
इतर समाजाप्रमाणे आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाची निर्मिती केली. शिक्षणातून उन्नती होईल या उदात्त हेतूने आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवून करोडो रुपये खर्ची घातल्या जाते. परंतु त्याचा फायदा मूळ आदिवासींना होत नाही. खेड्यापाड्यात, जंगल खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींची मुले आजही शिक्षण क्षेत्रात मागे आहेत. यावर आदिवासी नेत्यांनी मंथन करणे गरजेचे आहे. आदिवासी समाजातील नवतरुण, तरुणी, कर्मचारी, शेतमजूर, शेतकरी यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्या राजकीय नेत्यांना त्यांची जागा कोठे आहे, हे दाखवून द्यावे. त्यासाठी संघर्ष करण्यासाठी संघटीत व्हावे.
समाजाची अस्मिता, स्वाभिमान, अभिमान व संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संघटित होवून समाज विरोधी काम करणाऱ्या राजकीय नेत्यांना हाकलून लावावे, असे आदिवासी विद्यार्थी संघ, नॅशनल आदिवास्ौी फेडरेशनचे अध्यक्ष जगदीश खंडाते, योगेश इळपाते, संजय प्रधान, दिनेश सलामे व इतरांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (वार्ताहर)