कार्यमुक्त कंत्राटी एएनएमचे आजपासून ‘आमरण उपोषण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:47 IST2017-12-15T23:47:36+5:302017-12-15T23:47:53+5:30
राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्त ठरवून ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले. त्यांनी ४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले.

कार्यमुक्त कंत्राटी एएनएमचे आजपासून ‘आमरण उपोषण’
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्त ठरवून ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले. त्यांनी ४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. तरिही त्यांच्या मागण्या दुर्लक्षीतच राहिल्याने त्यांनी शनिवारपासून (दि.१६) आमरण उपोषण सुरू करीत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व पोलीस निरीक्षकांना दिले.
रिक्त जागांनुसार त्यांचे समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना अनेकदा देण्यात आले होते. मात्र तीन वर्षे लोटूनही आरोग्य विभागाने त्या कंत्राटी एएनएम यांना कामावर घेतले नाही. या अन्यायाविरूद्ध कंत्राटी बेरोजगार एएनएमनी अनेकदा जिल्हा परिषदेत पायपीट केली. बेमुदत साखळी उपोषणही सुरू केले. दरम्यान पालकमंत्र्यांनी मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले. परंतु त्यांनी दिलेले आश्वासनही हवेतच विरल्यासारखे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी शनिवारपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार केला आहे.
मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या चकरा मारत त्यांनी जि.प. पदाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले. मात्र त्यांच्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे कंटाळून त्यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे डॉ. माधवराव कोटांगले, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांच्या मार्गदर्शनात जि.प. कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले.
आता त्यांचे साखळी उपोषण ‘आमरण उपोषणात’ परिवर्तीत होत आहे. आता तरी जिल्हा परिषद प्रशासन न्याय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये रंजिता सार्वे, डॉली पालांदूरकर, शीला ठाकरे, शेफाली श्यामकुवर आदिंचा समावेश आहे.